म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रात्रीच्या वेळी समाजकंटकांकडून शहराचे वातावरण बिघडविले जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजकंटकांवर जरब बसाविण्यासाठी शहर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे़ त्यामुळे चौकाचौकांत पोलिसांचा खडा पहारा राहणार असून, शहराचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची व्यवस्था पोलिस विभागाकडून करण्यात येणार आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू आहे.
औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते़ त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सदैव सज्ज राहावे लागते़ गेल्या महिन्यात बाहेरील व्यक्ती येऊन त्यांनी औरंगाबाद नावाच्या बोर्डवर 'संभाजीनगर' लिहिले होते़ त्यामागे कोण आहे याचा शोध घेऊन पोलिस आयुक्तांनी त्या व्यक्तीला तंबी दिली़ त्यानंतर या आठवड्यात बेगमपुरा आणि आझाद चौक या ठिकाणी झालेल्या रात्रीच्या वादामुळे शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांडून केले गेले़ हा संपूर्ण प्रकार पोलिस प्रशासनाने व्यवस्थितपणे हाताळला आहे़ या प्रकरणांमागे कोण याचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे़ त्यासाठी एक विशेष पोलिस यंत्रणा काम करत असून, कागदोपत्री, पुराव्यांसह डेटा गोळा करण्याचे काम पोलिस विभागाकडून सुरू आहे़
\Bसलग आठ दिवस नाकाबंदी\B
प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत रात्रीच्या वेळेला नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे मंगळवारपासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा नाकाबंदी करत असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे़ पुढील आठ दिवस ही नाकाबंदी सुरू राहणार आहे़
\Bशांतता समितीच्या बैठका सुरू\B
पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या दोन झोनमध्ये विभागलेल्या १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहेत़ पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांनी बैठका घेऊन नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, काही अक्षेपार्ह बाब लक्षात आली तर, तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत.