म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्री नऊ वाजता जयभवानीनगरात उघडकीस आला. पंकज साहेबराव संकपाळे (वय २९, रा. जयभवानीनगर) असे तरुणाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलिसांनी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे बदनामी झाली असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख एका चिठ्ठीत आढळून आला आहे. दरम्यान, याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंकज संकपाळे याने गुरुवारी रात्री नऊ वाजता त्याच्या खोलीत आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आला. पंकज याच्यावर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अॅड. रमेश जाधव यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानपुरा पेालिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक कल्याण शेळके आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने यासंदर्भात कारवाई केली होती. संकपाळे याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये कल्याण शेळके; तसेच इतरांच्या नावाचा उल्लेख आहे. पंकजच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पंकजच्या नातेवाईकांनी करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. पोलिस निरीक्षक बावकर यांनी नातेवाइकांची समजूत काढली. पंकजचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक बावकर यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी सध्या याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकजजवळ आढळलेल्या चिठ्ठीची शहानिशा करण्यात येत असून, तपासामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बावकर यांनी दिली.