\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bलाखो भाविकांचे भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे मंदिर व प्रांगण सोमवारी भाविकांच्या तुडूंब गर्दीने ओसंडून वाहत होते. चंपाषष्ठी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांच्या मोठमाोठ्या रांगा सातारा गाव ते खंडोबा मंदिरात लागलेल्या दिसून आल्या. अनेकांना चार ते पाच तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शनाचा लाभ मिळाला.
प्राचीन हेमाडपंती शैलीतील व पुरातत्व दर्जा लाभलेल्या या मंदिरात हळदीचा भंडारा व रेवड्यांची उधळण केली गेली. गाभाऱ्याबाहेरील सभामंडपात वाघ्या-मुरळींचे संच खंडोबाचा गजर करत जोगवा मागत होते. गावात भरलेली यात्रा मंदिर ते एमआयटी कॉलेज रस्ता अशी व्यापली आले. त्यात पूजा साहित्य, रहाटपाळणे, मुलांची खेळणी, मिठाई, प्रसाद, कटलरी, लहान हॉटेल, चहाटपरी आदींचा समावेश आहे.
चंपाषष्ठीचा योग साधून आज दिवशी सकाळी पाच वाजता शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे, क्रेडाईचे राजेंद्रसिंह जबिंदा, नरेंद्रसिंग जबिंदा, आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले , अनिल अग्रहारकर, गणेश चोपडे,नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे, नगरसेविका सायली जमादार, साखरे आप्पा, राजूकाका नरवडे, गुलाबराव डागवाले (अहमदनगर) साताराचे पोलिस निरीक्षक पोटे, नलावडे, नितीन घोगरे आदींच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती करण्यात आली. यानंतर दांडेकर वाडा येथून वाजतगाजत खंडोबाची पालखी काढण्यात आली. रात्री साडेआठ वाजता पालखी मंदिरात परतली. पहाटे चारपासून मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदिरासमोरील दीपमाळेचे पूजन करत गाभाऱ्यातील खंडोबाचे दर्शन केले जात होते.
\Bआले ४७० वाघ्या-मुरळी
\Bनवस फेडणारे तळी उचलत जागरण गोंधळ घालत होते. यावेळी ४७० वाघ्या-मुरळींचे संच खंडोबाच्या दरबारात दाखल झाले आहेत. यात्रेसाठी पाणी पुरवठा आरोग्यपथकही सज्ज असून, रक्तदान शिबिरही घेण्यात आले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, पुजारी दिलीप धुमाळ, विश्वस्त विठ्ठल देवकर, सुभाष पारखे, सोमिनाथ शिराणे, लक्ष्मण चोपडे, दोलत चव्हाण, जिजा मधुकर काळे, पोलिस पथकातील आर. एम. कंटे, के. वि. विद्वंस, दत्ता भिडे आदींचे यात्रेच्या यशस्वितेसाठी सहकार्य लाभत आहे.
सातारा खंडोबा यात्रेसाठी देन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेतील दुकानदारांना यावर्षी कर माफ करण्यात आला. सोमवारी नवरात्राची समाप्ती झाली. आठ डिसेंबरला यात्रेची सांगता होईल.
\B- साहेबराव पळसकर, अध्यक्ष, सातारा खंडोबा मंदिर संस्थान
\B
सातारा खंडोबा यात्रेसह महाराष्ट्रातील अनेक देवस्थानच्या ठिकाणी आमचे ११ जणांचे पथक जागरण, गोंधळ सादर करते. ५३ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत.
\B- दौलत चव्हाण, सदस्य, वाघ्या-मुरळी पथक
\B