औरंगाबाद : शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या याचिकेची सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जालना रोडवरील दोन पंचतारांकित हॉटेल समोर कचरा टाकल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. पर्यटकांच्या शहरातील राहण्याच्या ठिकाणापासून मकबरापर्यंत कचऱ्याचे ढीग साचलेले त्यांना दिसतात, ही बाब खेदजनक असल्याचे खंडपीठाने म्हटले. कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला तोंड द्यावे लागत आहे, याचा विचार महापालिकेने करणे जरुरी आहे, असेही खंडपीठाने म्हटले. अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी हर्सूल येथील जवळपास ३०० झाडे तोडल्याचे, नहरे अंबरी फोडल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे आणि विहिरींतील पाणी काळे झाल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.