म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करोनाचा विषाणू रोखण्यासाठी परगाव, परराज्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. त्यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. मात्र, त्यांची नजर चुकवून विठ्ठलनगर येथील एक जण मंगळवारी पळून गेला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गेल्या तीन दिवसांतील हा तिसरा प्रकार आहे.
नुकत्याच पुण्याहून आलेल्या एका संशयिताला गोलवाडी येथे तपासणी करून विठ्ठलनगर, सिडको एन दोन भागात होम क्वारंटाइन केले होते. या संशयीताच्या तपासणीचे काम गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविले होते. गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी त्याच्या विठ्ठलनगर येथील घरी गेले असता तो घरी नव्हता. त्याचा शोध घेतला असता इतर नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशा पद्धतीने फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे, एपीआय गौतम वावळे, सुधाकर मिसाळ, तुकाराम राठोड यांच्या पथकाने केली