म. टा. प्रतिनिधी, पैठण
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील खरिपाच्या सुमारे ८९ टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त ८३ हजार शेतकऱ्यांना ६४ कोटी रुपयांची भरपाई अपेक्षित असल्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडून अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालानुसार, तालुक्यातील एकूण एक लाख नऊ हजार ५० हेक्टर खरीप लागवड क्षेत्रापैकी ९१ हजार १७८ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड करण्यात आली. यापैकी ८३ हजार ७२ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रापैकी सर्वाधिक म्हणजेच ७६ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. या क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, बाजारी या पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे पाच हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावरील मोसंबी व डाळिंब या फळपिकांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नुकसान भरपाई म्हणून जिरायत क्षेत्रावरील ७६ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सहा हजार ८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे ५२ कोटी २२ लाख, ७८२ हेक्टर, बागायत क्षेत्रावरील पिकांना प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे एक कोटी सहा लाख व पाच हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाना १८ हजार प्रती हेक्टरी प्रमाणे नऊ कोटी ८९ लाख असा एकूण ६३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.