म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी अंबादास भिका पालोदे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याने शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतातील बखरीत फाशी घेऊन जीवनयात्रा संपविली. सिल्लोड तालुक्यातील ओल्या दुष्काळाचा हा चौथा बळी आहे.
अंबादास पालोदे यांची वडाळा शिवारात गट क्रमांक १४ मध्ये तीन एकर शेतजमीन आहे. त्यांनी कर्ज काढून मका लागवड केली होती. परंतु, चांगल्या स्थितीत आलेले पीक अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. तीन एकरावरील पाणी साचल्याने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. पालोदे यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी बॕँक या कर्जाशिवाय इतर खासगी फायनान्स कंपन्यांचेही कर्ज असल्याने ते काही दिवसांपासून तणावात होते. पालोदे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, तीन बहिणी, असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर, बीट जमादार मनोहर सपकाळ यांनी पंचनामा केला.