\Bम. टा. प्रतिनिधी, जालना
\B'राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळात दहाच्या आकड्यावर मोठा भाऊ आहे तर, छोटा भाऊ दुसऱ्या दहाच्या आकड्यावर आहे. याचा अर्थ मोठा भाऊ विधानसभेच्या दहा जागा आणणार आणि छोटा भाऊ दहा जागा आणणार. हे त्यांच्याच घड्याळाने दाखवून दिले आहे. यापेक्षा जास्त काही होण्याची शक्यता नाही,' असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी परतूर येथे झालेल्या सभेत शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले.
प्रचारसभेत मोदी म्हणाले, 'केंद्रात व राज्यात सरकार एकच असेल तर, विकास होईल. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या सर्व योजनांची राज्य सरकारने चांगली अंमलबजावणी केली. त्याउलट मराठवाड्याच्या नावाने विकासाच्या योजना तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या नातेवाईक आणि चेलाचपाट्यांची घरे भरली.' जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनांचा गौरवाने उल्लेख करीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसला निवडणुकीत पूर्ण साफ करण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, 'महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिल्यानंतरही मराठवाड्यातील परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. रस्ते, पाणी, रुग्णालये, वीज या पायाभूत सुविधांसाठी नाहीत. कॉँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाशी भाजपच्या एकाच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाची तुलना केल्यास विकास लक्षात येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत अनेक वर्षे राज्य केले. त्यांची नियत खोटी होती. सर्व कामांत यांची भागीदारी होती. यामुळेच मराठवाड्याचे नुकसान झाले. त्याउलट विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये परस्पर ताळमेळ असणे आवश्यक आहे. तो पुढच्या पाच वर्षांतही ठेवल्यास मराठवाड्याचा विकास होईल. मराठवाड्यात सध्या राष्ट्रीय महामार्गाची ५० हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. शेगाव-पंढरपूर रस्ता, भारनियमनापासून मुक्तता, शेतकरी, उद्योजकांना वीजपुरवठा दिला जातो आहे. ड्रायपोर्ट, सीडपार्क, आयसीटी कॉलेज दिले जात आहे,' असे मोदी यांनी सांगितले.
\Bजागा दाखवा : पवार
\Bबीड : 'अनेकवेळा प्रचारार्थ यापूर्वी बीडला आलो, पण यावेळी वातावरण वेगळे आहे. जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते.
\Bभूलथापांना बळी पडू नका : शत्रुघ्न सिन्हा
\Bनांदेड : 'केंद्रात जी चूक झाली ती राज्यात करू नका. कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा,' असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. भोकर मतदार विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.