\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bमहापालिकेची सरकार दरबारी तब्बल ११३५ कोटींची कामे खोळंबली आहेत. त्या कामांची यादी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे पाठपुराव्यासाठी सोपवली.
विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने शासन दरबारी पालिकेच्या रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दानवे यांनी बैठक घेतली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, सभागृहनेता विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, स्मिता घोगरे, मनीषा लोखंडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दानवे म्हणाले, 'औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे नऊ आमदार आहेत. आम्ही एकत्र येवून प्रश्न मांडल्यास अनेक प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील.' महापौर नंदकुमार घोडेले यांनी दानवे यांना विभागनिहाय माहिती दिली. 'संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी यापूर्वी शासनाने निधी दिला आहे. उर्वरित निधी मिळावा अशी अपेक्षा आहे,' यावर दानवे म्हणाले, 'आठ कोटींचा निधी कला संचालनालयाकडून मिळवण्याचा प्रयत्न करू.' सातारा-देवळाई, नवीन पाणीपुरवठा योजना, रस्त्यांच्या कामांसाठी २५० कोटींचा निधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी उर्वरित निधी, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गतची विविध कामे, बीओटी प्रकल्प, कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, अग्निशमन केंद्रांची उभारणी आदी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरासाठीच्या १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला शासनाने स्थगिती दिलेली नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 'पेट्रोल - डिझेलच्या माध्यमातून शहरातून जास्तीचा कर वसूल केला जातो. या कराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकलेले आहेत, हा निधी मिळावा' अशी मागणी महापौरांनी केली.