म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यस्तरीय 'आविष्कार' महोत्सवात तिसऱ्या स्थानावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यावर्षी 'आविष्कार'चे सूत्रबद्ध नियोजन केले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाला चालना देण्यासाठी संशोधनवृत्तीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून राज्य पातळीवर चमकदार कामगिरीसाठी जिल्हा समन्वयक प्रयत्नशील आहेत.
विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 'आविष्कार महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'आविष्कार'ची तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नोंदणी सुरू आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. जिल्हास्तरीय 'आविष्कार' महोत्सव १० आणि ११ डिसेंबरला होणार आहे. तर विद्यापीठ परिसरात १५ डिसेंबरला होणार आहे. जिल्हास्तरीय 'आविष्कार' देवगिरी महाविद्यालय (औरंगाबाद), बलभीम महाविद्यालय (बीड), विद्यापीठ उपपरिसर (उस्मानाबाद) व जे. ए. कॉलेज (जालना) येथे होईल. गेल्या वर्षी राज्यस्तरीय 'आविष्कार'मध्ये विद्यापीठाच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. या संघामधील पाच विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. मागील वर्षी राज्य पातळीवर विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला होता. तब्बल एक हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला होता. यावर्षी विद्यार्थी संख्या वाढवून चांगली कामगिरी करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न आहेत. जिल्हास्तरीय 'आविष्कार'साठी जिल्हा समन्वयक नेमले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे समन्वयक डॉ. विष्णू पाटील, डॉ. प्रशांत अंबड आहेत. जालना जिल्ह्यासाठी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. तुषार धोंडगे, बीड जिल्ह्यासाठी डॉ. प्रमोद रोकडे, डॉ. सतीश जाधव आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. राम कदम व डॉ. किशन हावळ यांची निवड करण्यात आली. विद्यापीठ परिसरासाठी डॉ. भगवान साखळे आणि डॉ. मदनलाल सूर्यवंशी नियोजन करीत आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग वाढवण्यासाठी समन्वयक विशेष मोहीम राबवणार आहेत. एक हजार प्रकल्पातील ४८ प्रकल्प अंतिम फेरीत पोहचले होते. सामाजिकशास्त्र विषयाचे विद्यार्थीसुद्धा प्रकल्प सादरीकरण करीत आहेत. या कामासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) संस्थेने सहाय्य केले.
दरम्यान, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासाने 'आविष्कार'ची तयारी केली आहे. या महोत्सवाच्या समन्वयक डॉ. भारती गवळी असून डॉ. भास्कर साठे व डॉ. प्रवीण येन्नावार सहसमन्वयक आहेत.
-----गोंडवाणा विद्यापीठात महोत्सव
जिल्हा आणि विद्यापीठ स्तरावरील 'आविष्कार' महोत्सवानंतर राज्यस्तरीय महोत्सव गोंडवाणा विद्यापीठ (गडचिरोली) येथे होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी राहुरी येथील कृषी विद्यापीठात महोत्सव झाला होता. विद्यापीठ स्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय महोत्सवाचे दहा दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गटचर्चेद्वारे प्रकल्पाची मांडणी करण्याचे कौशल्य शिकवण्यात येईल असे 'आविष्कार'चे सहसमन्वयक डॉ. भास्कर साठे यांनी सांगितले.
----कोट
मागील वर्षी एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय महोत्सवात ४८ प्रकल्प सादर करुन विद्यापीठ तिसऱ्या स्थानी होते. यावर्षी पहिला क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.
डॉ. भास्कर साठे, सहसमन्वयक, 'आविष्कार' महोत्सव