अ‍ॅपशहर

दोन बहिणींचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; एकाच वेळी ६ जणांवर अंत्यसंस्कार; लहानगा आईच्या मायेला पोरका

Sambhajinagar Accident: भाग्यश्री आणि किरण या दोघांच्या लग्नाची काही दिवस आधीच वर्षपूर्ती झाली होती. मात्र समृद्धी हायवेवरील अपघातात दोघांनीही प्राण गमावले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2023, 12:37 pm
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी रविवारचा दिवस हा काळा दिवस ठरला. शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाच्या कारला समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन बहिणींसह त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना जागीच मृत्युमुखी पडल्या तर इतर कुटुंबातील सहा जण गंभीररित्याा जखमी झाले होते. रात्री शोकाकुल वातावरणात हडको एन आकाराच्या स्मशानभूमीत सहाही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sambhajinagar accident
संभाजीनगर अपघात


प्रमिला बोरुडे वय-५८, त्यांचा मुलगा किरण बोरुडे वय -३५, सून भाग्यश्री किरण बोरुडे वय -२८, अशी एका बहिणीच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत तर हौसाबाई बर्वे वय -६०, सून श्रद्धा बर्वे वय -२७, नात जानव्ही बर्वे वय-११ अशी दुसऱ्या बहीण आणि त्यांच्या परिवारातील मृतांची नावे आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रतिक्विंटल ३०० रुपयांचा बोनस

किरण आणि भाग्यश्रीच्या लग्नाची नुकतीच होती वर्षपूर्ती, ४ वर्षीय चिमुकला झाला पोरका

मृत किरणचा शहरातील राजीव गांधी मार्केटमध्ये लॉंड्रीचा व्यवसाय होता. शनिवारीच किरणने सात लाख रुपये किमतीची नवीन मशीन घेऊन त्याचे उद्घाटन केले होते. वर्षभरापूर्वी त्याचे भाग्यश्रीसोबत लग्न झाले होते. भाग्यश्री आणि किरण या दोघांच्या लग्नाची काही दिवसांपूर्वीच वर्षपूर्ती झाली होती. मात्र दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर अपघातात श्रद्धा बर्वे यांच्यासह त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पती सुरेश व चार वर्षांचा मुलगा जतीन गंभीर जखमी आहेत. आईच्या मृत्यूमुळे चार वर्षांचा जतीन आईच्या मायेला पोरका झाला आहे.

फक्त पायांचे दर्शन घेऊन दिला मुखाग्नी, चेहराही पाहता आला नाही

प्रमिला बोरुडे व हौसाबाई बर्वे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या .दोन्ही बहिणींचे कुटुंब हे शहरातच राहायला होते. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो वा सन-उत्सव दोन्ही कुटुंब एकत्रितपणेच साजरा करायचे. शेगावला दोन्ही परिवार सोबत जाताना त्यातील सहा जण मृत्युमुखी पडले होते, तर सहा जखमींवर औरंगाबादेत उपचार सुरू होते. रात्री शहरात चार रुग्णवाहिकेतून सहा मृतदेह आले. संपूर्ण झाकलेल्या अवस्थेतील मृतांचे चेहरेही नातेवाईकांना पाहता आले नाहीत. फक्त पायांचे दर्शन घेऊन सर्व सहा मृतांवर एकाच स्मशनाभूमीत नातलगांनी अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख