अ‍ॅपशहर

बाजारपेठ २८ सप्टेंबरला बंद

म टा...

Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वॉलमार्ट व फ्लिपकार्ड या दोन कंपन्याच्या करारास तसेच १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय)ला दिलेली परवानगी या विरोधात व्यापारी एकवटले आहेत. या प्रश्नी २८ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला जिल्हा व्यापारी महासंघ व त्यांच्याशी संलग्न ७२ संघटनांचा सक्रीय पाठिंबा आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.

बंदची हाक कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिली आहे. वॉलमार्ट व फ्लिपकार्ड या दोन कंपन्यामधील करार तसेच शासनाने १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) दिलेली परवानगी हा व्यवहार स्थानिक व्यापाऱ्यांना एक अभिशाप ठरणार आहे. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.

देशात साडेआठ कोटी व्यापारी देशातील ८५ टक्के बाजार चालवितात. देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचे ४५ टक्के योगदान आहे. तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ४० कोटी लोकांना रोजगार यामुळे उपलब्ध होतो. भारत हा मोठा उपभोक्ता देश असल्याने जगाचे लक्ष त्याकडे आहे. त्यात विदेशी कंपन्या या बाजारपेठेवर कब्जा करण्याच्या दृष्टीने मोठी दुकाने, ई कॉर्मस कंपन्यांना जास्त भाव देऊन खरेदी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या कंपन्या आल्यावर रोजगार वाढले, असे सरकार सांगते, परंतु, या कंपन्या ९० टक्के रोबोटिक अॅटोमिशनद्वारे कामे करतात. अशा परदेशी कंपन्यांच्या आगमनामुळे भारतीय बाजारावर विपरित परिणाम होईल, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, बंदला व्यापारी महासंघ व संलग्न सर्व संघटनांनी पाठिंबा दिला असून ठिकठिकाणी बैठक घेत आंदोलनाचे नियोजन केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज