\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिडको येथील पक्ष कार्यालयासमोर मिठाई वाटप करत जोरदार जल्लोष केला. दिल्लीमध्ये हॅट्रिक केली. आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याशिवाय राहणार नाही. जनता विकास म्हणजे 'आप'लाच साथ देईल, असा विश्वास पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. सुभाष माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सलग तिसऱ्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ने बाजी मारली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासातच राजधानीत 'आप'चेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री केजरीवाल याचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मिठाईचे वाटप करत, एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, या आनंदोत्सवानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष डॉ. सुभाष माने म्हणाले, 'दिल्लीतील जनतेने विकासकामांना साथ दिली आहे. आता आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. शिवसेना - भाजप गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. त्यांनी शहरात कोणतीही विकासकामे केली नाहीत. आतापर्यंत जनतेकडे अन्य कोणताही ठोस असा पर्याय नव्हता. आता 'आप' एक सक्षम पर्याय जनतेसमोर आहे. विकासकामे हाच मुद्दा घेऊन आम्ही रिंगणात उतरणार असून, ११५ जागांवर उमेदवार देऊ. महापालिका निवडणुकीत निश्चितच भरीव कामगिरी करू आणि चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही. महापौर हा आपचाच असेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर 'महापालिका निवडणुकीत राजकीय परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. पक्ष बांधणी आणि निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे,' अशी माहिती कार्याध्यक्ष इसाक अंडेवाले यांनी दिली.