म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दरवर्षीप्रमाणे १९९० पासून जाणारे औरंगाबाद जिल्हा तसेच आष्टी तालुक्यातील (जि. बीड) १२० भाविक मंगळवारी (३ जुलै) सचखंड एक्सप्रेसने अमरनाथ यात्रेला रवाना झाले. या भाविकांचा प्रवास अमृतसर, जम्मू, श्रीनगरमार्गे अमरनाथ गुफेकडे होणार आहे.
परतीच्या प्रवासात हे यात्रेकरू वैष्णोदेवी, शिवखोरीसह हिमाचल प्रदेशातील ज्वालादेवी, नयनादेवीसह पाच देवींची यात्रा करुन १६ जुलै रोजी परत येणार आहेत. या यात्रेकरुंसाठी दरवर्षी रोटरी क्लब सेंट्रल व लाठी फार्मा यांच्या वतीने आवश्यक औषधी साहित्य पुरवल्या जाते. एका छोटेखानी कार्यक्रमात ही औषधी देऊन यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी यात्रा पासचे वितरण बँकेचे अधिकारी नागेश शर्मा व गोपाल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आष्टीच्या ग्रुपचे संचालक अरुण जिबकाटे व औरंगाबादच्या ग्रुपचे संचालक ताराचंद कहाटे यांच्याकडे पास देण्यात आले. यात्रेसाठी ग्रुपचे विजयकुमार बोथ्रे, अरविंद शेवाळे, सागर बनकर, विजय राजपूत आदी मंडळींनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रवीण पवार, सचिव भारत चोपडे, लाठी फार्माचे जयनारायण लाठी, बसवराज जिबकाटे, अरुण राव, सुनील कोतकर, डॉ. राजीव मुंदडा, नरेंद्र लड्डा, माजी जिल्हा माहिती अधिकारी सुधाकर भारती आदींची उपस्थिती होती.