म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'प्रत्येक काळात कविता प्रचंड लिहिली गेली आहे. या परिस्थितीत कवीने वाहवत जाण्याची गरज नसून, शब्द सामर्थ्य ओळखण्याची गरज आहे. कवीने शब्द शस्त्रासारखे वापरावे. कारण कवी हा द्रष्टा मानला जातो,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी केले. 'मटा कविसंमेलन' उपक्रमात त्या बोलत होत्या.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या (औरंगाबाद आवृत्ती) सातव्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक 'मटा कविसंमेलन' घेण्यात आले. या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल २५६ कवींनी सहभाग घेत वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. या उपक्रमातील सर्वोत्कृष्ट पाच कवितांची निवड करून कवींचा सन्मान करण्यात आला. 'मटा' कार्यालयात गुरुवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, परीक्षक कवी श्रीधर नांदेडकर, 'साकेत' प्रकाशनच्या प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. नवोदित कवींच्या कवितेवर व मांडणीवर अनुराधा पाटील यांनी भाष्य केले. 'नवोदित कवींकडून दर्जेदार कवितेच्या अपेक्षा आहेत. उत्तम कवितेसाठी विचार व चिंतनाची गरज आहे. आपल्यासमोर अनेक गोष्टी घडतात. आपल्या मध्यमवर्गीय जगण्याला पडझडीचे फार संदर्भ नसतात. तरीसुद्धा वाहवत न जाता स्वत:ची क्षमता ओळखून व्यक्त होणे आवश्यक आहे. नव्याने करता येईल, अशी फक्त कविता गोष्ट आहे. कारण भाषेत नावीन्य असते. कवीने कवितेत स्वत:ची भाषा घडवावी,' असे पाटील म्हणाल्या.
श्रीधर नांदेडकर यांनी चिंतनशील कवितेची गरज व्यक्त केली. 'कष्टपूर्वक लिहिलेली कविता छापून येणे अद्भूत गोष्ट होती. सोशल मीडियासारखे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे कविता लेखनाचा वेग वाढला आहे. ही गती कवितेसाठी फलदायी नाही. कवीला चिंतनासाठी वेळ उरला नाही. अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध असले तरी संयमित आणि चांगला वापर गरजेचा आहे. भराभर लिहिण्यातून कवितेचा मूळ गाभा हातून निसटतो. खूप कविता लिहिण्यापेक्षा मोजके लेखन करा. या घाईत अनेक चांगल्या कवींची वाट चुकते' असे नांदेडकर म्हणाले. कवींसाठी लेखनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. विविध माध्यमातून व्यक्त होण्याची गरज प्रतिमा भांड यांनी व्यक्त केली. 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
तरुण कवींनी कविता आतून फुलून द्यावी आणि नंतर लिहावी. दरवर्षी एक कवितासंग्रह प्रकाशित करावा हा दबाव कुठून येतो ? खूप लिहिण्यापेक्षा मोजकेच आणि दर्जेदार कविता लेखन महत्त्वाचे असते.
- श्रीधर नांदेडकर, कवी-परीक्षक
कविता लिहिणे ही दैवी देणगी मानते. कविता लेखन हा अत्यंत अवघड प्रकार आहे. पण, कवितेसोबतच कवींनी लेखनाचे इतर प्रकार हाताळावे असे वाटते. या क्षेत्रातली प्रतिभेला मोठी संधी आहे.
- प्रतिमा भांड, प्रकाशक, 'साकेत प्रकाशन'
\B---
विजेते कवी
---
\B- शब्बीर शेख, सिल्लोड
- नम्रता फलके, औरंगाबाद
- रामप्रसाद वाव्हळ, औरंगाबाद
- नीलेश चव्हाण, औरंगाबाद
- जगदीश पवार, बीड
\B
---
क्षितीज
\B---
आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत
त्यांची जागा आता मुक्त हवा बंदिस्त करणाऱ्या दुमजलींनी घेतली आहे...
विटा वाढविण्याच्या त्यांच्या शर्यतीत माझ्या मावळत्या सूर्याचा त्यांनी बळी
घेतलाय..
हवाही वाहते मोजकीच इथे
पावसांच्या धाराही फक्त अश्रूच गाळतात !
या जगाचा क्रूर शाप भोगतंय माझं जग
जे सोज्ज्वळ निरपेक्ष होतं काही वर्षांपूर्वी !
उसासे सोडतोय तो डोंगर जो हरलाय या शर्यतीत…
आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...
आधी हवा सुसाट असायची माझ्या चेहऱ्यावर
आता दबकतच शिरते या बंदिस्त छपरावर
चांदण्या मोजतानासुद्धा एखादी छत्री मोजावीच लागते आता !
त्या स्वच्छंद दृष्टिक्षेपाला कैद केलय यांच्या अहंकाराने
ज्यांना फरकच पडत नाही चिवचिवाट संपल्याने
कारण आता माझ्या घरावरून समोरची क्षितीजं दिसत नाहीत...
क्षितीजं दिसत नाहीतच आता !
काही दिवसांतच कळेल त्यांना
क्षितीजं हरविल्याची किंमत
जेव्हा शरीर असेल कोमेजलेलं त्यांच्या आर्टिफिशल प्रकाशात
आणि एअर कण्डीशनल ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसांत तेव्हा फक्त उशीर होऊ नये,
आणि क्षितिजांनी उठाव करू नये
एवढीच प्रार्थना !
- नम्रता फलके, औरंगाबाद
---
\Bजंगल
\B---
रोज रोज भांडण होतं
माझ्यात आणि आज्जीत
बोलत असतो आम्ही
जे जे येईल मर्जीत
आज्जी म्हणते
संपत चाललंय जंगल
वाढत चाललंय शहर
मी म्हणतो
वाढत चाललंय जंगल
संपत चाललंय शहर
आज्जी म्हणते बेटा असं
बोलू नको रेटून
जंगलच जंगल असे
वस्तीला खेटून
रोज रोज पडायची
माणसाच्या कानी
चिमणीची चिवचिव
कोकिळेची गाणी
कमी झालेत पशू पक्षी
दिसत नाही झाड
कुठेच पशू पक्ष्यांचे
होत नाही लाड
मी म्हणतो आज्जी तुझं
सगळं आहे कबूल
पण एक छोटीशी
करतेस तू भूल
मनामनात जहर आहे
रोज नवीन कहर आहे
माणसाचं जिनं आज्जी
पशूपेक्षा बत्तर आहे
एकाला लागून दुसरी
गुहा आहे घर नव्हे
म्हणून म्हणतो आज्जी मी
हे जंगल आहे शहर नव्हे
- शब्बीर शेख, सिल्लोड
---
\Bगेला गेला दूर गेला
\B---
गेला कुठे पावसाळा ?
लागे मातीला तहान
गेला कुठे पावसाळा ?
सारं करपलं रान
कसा निघतो हा जाळ
ये रे परतूनी बाबा
सुनं होण्याआधी भाळ
ढग पांढरा पांढरा
ढग गेला कुठे काळा ?
लागे मातीला तहान
गेला कुठे पावसाळा ?
मन लागेना वारीत
मन आहे वावरात
पावसाळा लपला का
विठू तुझ्या रे घरात ?
विठू जळाली तुळस
तुला तुळशीच्या माळा
लागे मातीला तहान
गेला कुठे पावसाळा ?
- नीलेश चव्हाण
---
\Bतुझ्या माझ्या राखेने....
\B---
तू भिरकावलेस दगड
मीही भिरकावले दगड
त्याने आभाळाला तडे गेले
तुझे रान माझे रान
गारांनी उद्ध्वस्त केले
तू पेटविलेस बांध
मीही पेटविले बांध
आग पाताळाला गेली
तुझ्या-माझ्या मातीची
कूस जळून खाक झाली
तू तडफडून मेलास
मीही तडफडून मेलो
रानाचे स्मशान झाले
तुझ्या- माझ्या राखेने
हे शिवार अंधूक झाले....
-रामप्रसाद वाव्हळ
---
\Bउसामधली जिंदगानी
\B---
उसामंदी बांधला मी गोड गोड झुला
झोप झोप झोप, आता झोप माझ्या बाळा !!
उसामधला गोडवा राजा यावा तुझ्या जिंदगीला
अंग कापणाऱ्या पाचटाला मी सोशील रे बाळा!!
गेल्या साली याच रानी तू जन्मताना बाळा
चार ऊसाच्या चिपाडांनी मज आडोसा रे दिला!!
माझासुद्धा जन्म बाळा असा फडातच झाला
माय असून पोटोशी बाप पोट भरायाला आला !!
शिळ्या भाकरीवं रातीच्या कसं पाजणारं तुला
मी बांधतेय मोळी जीव झुल्यात गुंतला!!
पाणी कोपीतं शिरलं पाऊस अवकाळी आला
तुझ्या बाच्या खांद्यावं तू सारी रात निजला!!
म्होरच्या जन्मी नको जन्मू उसामंदी बाळा
ऊस नसतो रे गोड जगता ऊसामंदी बाळा!!
'उसामधली' जिंदगानी नसो वैऱ्याच्या वाटेला
कैक खपतात पिढ्या नसे 'गोडवा' जिंदगीला!!
- जगदीश पवार, कुसळंब, बीड