म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिल्या उत्तरपत्रिका तपासणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तरीही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आक्षेप कायम असल्यामुळे तिसऱ्यांदा उत्तरपत्रिका तपासणीचा नवा प्रयोग नाट्यशास्त्र विभाग करणार आहे. स्वायत्त विभागाच्या अधिकारात घडत असलेला बेजबाबदारपणा विद्यार्थ्यांना जेरीस आणणारा ठरला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभाग नियोजनशून्य परीक्षेमुळे वादात आहे. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (बीपीए) प्रथम वर्षाच्या निकालावरून वाद सुरू आहे. एकूण ३१ विद्यार्थ्यांनी द्वितीय सत्राची परीक्षा दिली होती. 'नाट्यशास्त्र' विषयात पहिल्या निकालात फक्त पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुद्देसूद उत्तरे लिहूनही कमी गुण दिल्याचा ठपका विद्यार्थ्यांनी ठेवला. शिवाय विभागाचा परफॉर्मन्स घसरल्यामुळे पुन्हा उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या निकालात १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उरलेल्या १४ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रक्रियेवर आक्षेप कायम ठेवल्यामुळे विभाग तिसऱ्यांदा पेपर तपासणार आहे. प्रा. डॉ. अशोक बंडगर 'नाट्यशास्त्र' विषय शिकवतात. प्रश्नपत्रिकासुद्धा बंडकर यांनी तयार केली होती. नियमानुसार उत्तरपत्रिका तपासण्याचे काम त्यांना देणे आवश्यक होते, मात्र ऐनवेळी विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी हे काम तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्रा. सुरेखा मसाळ यांच्याकडे सोपवले. पहिल्या निकालात फक्त पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे वाद झाला. विद्यार्थ्यांनी बंडगर यांच्यावर आक्षेप घेतला. आपण उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'नियमानुसार उत्तरपत्रिका मला तपासणीसाठी का दिल्या नाहीत,' अशी विचारणा त्यांनी विभागप्रमुखांना केली. या मुद्द्यावर बंडगर आणि शेवतेकर यांच्या खडाजंगी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुरेशी उत्तरे लिहिली नसल्यामुळे जास्तीचे गुण कसे देणार असा सवाल शेवतेकर यांनी केला, पण बंडगर यांनी नमुन्यादाखल काही उत्तरपत्रिका दाखवल्या. अपेक्षित उत्तरे असूनही विद्यार्थी नापास झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी प्रा. मसाळ यांनी पेपर तपासले. या तपासणीत प्रचंड खाडाखोड करुन गुण वाढवण्यात आले. दुसऱ्या तपासणीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मग पहिल्या तपासणीत अनुत्तीर्ण कसे झाले यावरून विद्यार्थी, प्राध्यापक व विभागप्रमुख यांच्यात मतभेद झाले आहेत.
दरम्यान, उत्तरपत्रिकांचा गठ्ठा डॉ. अशोक बंडगर यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, विभागप्रमुखांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी नियमानुसार पत्र दिले नसल्यामुळे गठ्ठा पडून आहे. तिसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकारात 'सीएचबी' प्राध्यापकांचा ढिसाळपणा आणि विभागाचा बेजबाबदारपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
\Bएकांकिका म्हणजे काय?
\Bया परीक्षेत एकांकिका म्हणजे काय, असा प्रश्न होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहूनही आठपैकी फक्त अर्धा गुण बहुतांश विद्यार्थ्यांना देण्यात आला. हा प्रश्न आणि उत्तर बंडगर यांनी जाहीरपणे वाचून दाखवले. कोणत्या नियमानुसार अर्धा गुण दिला, असे त्यांनी विचारले. तर मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण आणि सरस उत्तर लिहूनही इतरांना कमी गुण दिल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. जुलै महिन्यात पहिला निकाल, ऑगस्ट महिन्यात दुसरा निकाल आणि आता सप्टेंबर महिन्यात तिसरा निकाल जाहीर करण्याची किमया विभाग करणार आहे.
लेखन क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना कमी गुण देण्यात आले. नाट्यशास्त्राचे विद्यार्थी प्रात्यक्षिकात वरचढ असतात. मात्र, लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करतात. एकही विद्यार्थी नापास झाला नसून 'एटीकेटी'मुळे त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे.
- डॉ. जयंत शेवतेकर, विभागप्रमुख