म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन आठवड्यापासून शहरात तापमानाचा चढ-उतार असला तरी दोन दिवसांपासून बोचरे थंड वारे वाहत असल्यामुळे शहराला हुडहुडी भरली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभर गारठा राहिला. शुक्रवारी (१० जानेवारी) शहराचे किमान तापमान १०.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले.
जानेवारीच्या प्रारंभापासून शहरामध्ये अंगाला झोंबणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि थंडी असल्यामुळे वातावरणात दिवसभर गारठा राहत आहे. शहराच्या किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट झाली आहे. दिवस कलण्यास सुरुवात होताच अंगाला थंड वारे झोंबण्यास सुरुवात होते. सध्या अधून-मधून शहरात ढगाळ वातावरणही अनुभवण्यास मिळत आहे. किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सियस नोंदवले जात असले तरी थंड वाऱ्यामुळे प्रत्यक्ष परिणाम यापेक्षा कमी तापमानाचा येत आहे.
साधारणत: दिवाळीत सुरू होणारी थंडी यंदा थोड्या उशिरा सुरू झाली. दोन दिवसांपासून थंड वाऱ्यांनी जोर धरला आहे. गुरुवारी शहराचे तापमान १३.९ अंश सेल्सियस होते, मात्र सायंकाळी थंड वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर तापमानात घट झाली, पारा घसरून शुक्रवारी सकाळी १०.६ अंश सेल्सियसवर स्थिरावला. दोन दिवसांपासून थंड वारे वाहत असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी सूर्य मावळताच प्रचंड थंडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात किमान व कमाल तापमानात फार बदल होण्याची शक्यता नाही. मात्र तापमान वाढले तरी झोंबणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवणार हे निश्चित.
\Bढगाळ वातावरण कायम\B
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ ते १५ जानेवारीदरम्यान शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. अशा वातावरणामध्येही किमान तापमानात घट होणार असल्यामुळे थंडी मात्र कायम राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीमध्ये कमाल तापमानही २७ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.