म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे काम आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. प्रभागरचनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे. ही निवडणूक प्रभागरचनेनुसार घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून २१ नोव्हेंबरपर्यंत प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांच्या समितीने २७ नोव्हेंबरपर्यंत प्रभागरचनेच्या अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवायचा आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर महापालिकेने उपायुक्त मंजुषा मुथा यांच्या नेतृत्वाखाली प्रभागरचनेचे काम सुरू केले. प्रभागरचना करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र देखील काढण्यात आले, परंतु त्यानंतर प्रभागरचनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढू लागल्याचे लक्षात आल्याचे स्पष्ट करून त्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियुक्त्या स्थगित करण्यात आल्याचे अधिकृत पत्र मात्र काढण्यात आले नाही.
\Bवॉर्ड जोडण्याची माहिती गोपनीय\B
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रभागरचनेचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर केले जात आहे. प्रभागरचना कशी केली जात आहे, कोणकोणते वॉर्ड एकमेकांना जोडले जात आहेत, याची माहिती बाहेर जाऊ नये यादृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. तेच ते नगरसेवक चार-चार, पाच-पाच वेळा कसे निवडणून येतात, असा सवाल उपस्थित करून नेहमी निवडून येणाऱ्या नगरसेवकांना ब्रेक कसा लागेल या दृष्टीने प्रशासनाच्या पातळीवर प्रभागरचनेचे काम केले जात आहे.