म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्सून राज्यातून निघून गेल्यानंतरही मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुष्काळ कायम राहणार असल्याचे चित्र बरसलेल्या पावसावरून दिसते. दरम्यान २०१८-१९ या वर्षामध्ये दुष्काळी अनुदान चारा, पाणीटंचाई निवारणासाठी सरकारला पावणेतीन हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. विषेश म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही मराठवाड्यातील सर्वाधिक पाऊस झालेला औरंगाबाद जिल्ह्यातही टँकर सुरू आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीचा पावसाचा रुसवा यंदाही कायम आहे. खरीप तरण्यापुरता पाऊस झाला असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी येणाऱ्या वर्षभरात निम्म्या मराठवाड्याची भटकंती राहणार असल्याचे चित्र एकूण झालेल्या पावसावरून दिसते. अत्यल्प पावसामुळे सरकाराने गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून दुष्काळ निवारणाची कामे सुरू केली असली तरी, निकषानुसार ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आता सततच्या दुष्काळी परिस्थितीला वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, सरकारने वर्षभरापासून सुरू असलेले दुष्काळ निवारणची कामे कायम ठेवली आहेत. आतापर्यंत या कामांवर दोन हजार ७९१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदान वाटपासाठी दोन हजार १६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदा पावसाअभावी सुरू कराव्या लागलेल्या चारा छावण्यांसाठी ३९५ कोटी रुपयाचा निधी देण्यात आला होता. या कालावधीमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतर अद्यापही दुष्काळावर सरकारकडून खर्च सुरूच आहे.
गेल्या महिन्याभरात मराठवाड्यातील बहुतांश भागात अधून-मधून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पावसाची सरासरी ७५.५० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. या पावसामुळे खरीप तरले मात्र पिण्याच्या पाण्याची होरपळ अद्याप कायम आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील गावांमध्ये बहुतांश विहिरींचीही पाणीपातळी तळालाच आहे. त्यामुळे अद्यापही अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अद्यापही विभागामध्ये परतीचा पाऊस सातत्याने बरसत आहे, मात्र येत्या काही दिवसांत पावसाळा संपणार असल्यामुळे परिस्थिती पाहता परतीचा पाऊसही मराठवाड्याला दुष्काळाच्या जोखडातून बाहेर काढेल याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या वर्षभरातही मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील गावांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
\B१७ तालुक्यांत चिंता\B
दरम्यान, मराठवाड्यातील खुलताबाद, परभणी, हिंगोली, वसमत, गेवराई, शिरूर कासार, अंबेजोगाई, केज, धारूर, परळी, लातूर, औसा, उदगीर, देवणी, उस्मानाबाद, भूम, परंडा तालुक्यांत ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. या तालुक्यांतील स्थिती चिंताजनक आहे.