अ‍ॅपशहर

ST Strike News : एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; रोजगाराच्या शोधात सुरू केली 'ही' कामं

ST Strike News: काही कर्मचारी भाजीपाला विकत आहे, तर काही कर्मचारी शेतात आद्रक काढणीच्या कामाला जात आहेत. गवंड्यांच्या हाताखाली काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 20 Jan 2022, 10:50 am
औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे, जवळपास तीन महिन्यांपासून कामावर नसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तोडगा दृष्टिपथात नसल्यामुळे, अनेक कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विकण्यापासून, ट्रक चालवण्यापर्यंत मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus


एसटी कर्मचाऱ्यांचा ७३ दिवसांपासून संप सुरु आहे. अनेक संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. मात्र संपकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. आता कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. यात विशेषतः परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. सिल्लोड येथील आगारात वाशीम, अमरावती, बुलडाणा, जळगाव, बीड, अहमदनगर आदी जिल्ह्यातील जवळपास २० कर्मचारी आहेत. स्थानिक कर्मचाऱ्यांना मित्र, नातेवाइक मदतीसाठी पुढे आले. मात्र, परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे तालुक्यात कुणी नातेवाइक नसल्याने ते मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

लवकरच डोक्यावरील टोपी निघणार; अब्दुल सत्तार यांची दानवेंवर खोचक टीका
काही कर्मचारी भाजीपाला विकत आहे, तर काही कर्मचारी शेतात आद्रक काढणीच्या कामाला जात आहेत. गवंड्यांच्या हाताखाली काम करून उदरनिर्वाह करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. यात काही कर्मचारी विहिरीच्या कामावर जात असल्याचे समोर आले आहे. ट्रक, काळीपिवळी टॅक्सी असे मिळेल ते काम कर्मचारी करीत असल्याचे चित्र आहे.

परजिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही दानशूर व्यक्तींची मदत घेत त्यांनी स्वतः पैसे जमा करीत कर्मचाऱ्यांना किराणा किट, भाजीपाला, अन्नधान्याची मदत केली आहे. मात्र, संपामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली असून संपावर तोडगा निघावा व एस टी पुन्हा पूर्ववत सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

काही बस फेऱ्या सुरू

सिल्लोड आगारात ९० चालक व ८५ वाहक असून यातील ९ चालक व २१ वाहक कामावर परतले आहेत. आगारातून औरंगाबाद व कन्नड अशा दिवसभरात २२ ते २४ फेऱ्या सुरू असल्याने बसस्थानकावर काही प्रमाणात प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या मात्र अद्यापही बंदच आहे. आगारातील सर्व बसची वॉशिंग करून अद्यावत केलेल्या आहे. संपावर तोडगा निघावा व बससेवा पूर्ववत सुरू व्हावी, याची आम्ही वाट पाहात असल्याचे आगारप्रमुख आनंद चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज