\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bअजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूसासाठी यंदा औरंगाबादच्या भाविकांची सोय म्हणून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. ही रेल्वे नांदेड येथून निघणार आहे.
अजमेरच्या उरूसासाठी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यांची सोय व्हावी म्हणून यंदा तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यात हैदराबाद - अजमेर - हैदराबाद, काचीगुडा - अजमेर - काचीगुडा आणि नांदेड - मदार जंक्शन - नांदेड या गाड्या आहेत. हैदराबाद - अजमेर - हैदराबाद आणि काचीगुडा - अजमेर - काचीगुडा या दोन्ही रेल्वे अकोला मार्गे जाणार आहेत. तर नांदेड - मदार जंक्शन - नांदेड (रेल्वे क्रमांक ०७६४१/०७६४२) ही विशेष रेल्वे औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणार आहे. ही रेल्वे २८ फेबुवारीला मदार जंक्शनकडे धावेली. ती नांदेड येथून दुपारी चार वाजता निघणार आहे. औरंगाबादला ही गाडी रात्री आठ वाजून ४० मिनिटांनी येणार आहे. ती २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराला मदार जंक्शनवर पोहचेल. या रेल्वेचा परतीचा प्रवास चार मार्च रोजी मदार जंक्शनहून रात्री नऊ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल. ही रेल्वे सहा मार्च रोजी सकाळी सात वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. ही रेल्वे २० डब्ब्यांची आहे.