अ‍ॅपशहर

सात हजार गावांत टंचाईचे संकट

पाऊस कमी पडल्यामुळे महाराष्ट्रातील सात हजार १३९ गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील ३५३पैकी २४१ तालुक्यांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यापैकी २३० गावांत भूजल पातळीत घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

श्रीपाद कुलकर्णी | Maharashtra Times 13 Nov 2017, 3:00 am
औरंगाबाद : पाऊस कमी पडल्यामुळे महाराष्ट्रातील सात हजार १३९ गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील ३५३पैकी २४१ तालुक्यांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यापैकी २३० गावांत भूजल पातळीत घट झाल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water crisis in seven thousand villages
सात हजार गावांत टंचाईचे संकट


‘जीएसडीए’ने पावसाळा संपल्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या आहेत. भूजल पातळीतील घट आणि पर्जन्यमान यांचा अभ्यास करून संभाव्य टंचाईचा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यात ३५३पैकी ९७ तालुक्यांतील पावसात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहेत. त्याचबरोबर ४५ तालुक्यांत २० ते ३० टक्क्यांदरम्यान, ८० तालुक्यांत ३० ते ५० टक्क्यांदरम्यान आमि १९ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याच्या नोंदी आहेत. राज्यातील तीन हजार ९२० निरीक्षण विहिरी आहेत. या विहिरींतील पाणी पातळीचा गेल्या पाच वर्षांच्या पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. या पाहणीत २३० तालुक्यांतील दहा हजार १६७ गावांत भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. त्यातील एक हजार ९९५ गावांतील भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. त्याशिवाय दोन हजार ५८७ गावांत दोन ते तीन मीटर आणि पाच हजार ५८५ गावांतील भूजल पातळीत एक ते दोन मीटर घट झाल्याचे ‘जीएसडीए’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आणि भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट झालेली राज्यात सात हजार १३९ गावे आहेत. या गावांत पाणी टंचाई भासणार आहे. ८४ तालुक्यांतील एक हजार ५४६ गावांतील भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. या गावांत ऑक्टोबर महिन्यापासून पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर १०५ तालुक्यातील एक हजार ९३३ गावांत भूजल पातळीत दोन ते तीन मीटर घट झाली आहे. तेथे जानेवारी २०१८पासून पाणी टंचाई जाणवेल आणि १३२ तालुक्यातील तीन हजार ६६० गावांत भूजल पातळी एक ते दोन मीटरदरम्यान कमी झाली आहे. तेथे एप्रिल २०१८पासून पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

भूजल पातळीत एक मीटरपर्यंत घट झालेल्या गावांत पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असते. या गावांतील टंचाई नियंत्रणात ठेवता येण्यासारखी असते. त्याचबरोबर पर्जन्यमानात २० टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावांत पाणी टंचाई भासण्याची शक्यता नसते, असेही या अहवालात नमूद केले आहे.

विदर्भातील स्थिती चिंताजनक
या वर्षी विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होते. मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद व बीड वगळता अन्य जिल्ह्यांत कमी पाऊस पडला. त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मराठवाड्यातील ७६पैकी केवळ १६ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. विदर्भातील ११९पैकी केवळ चार तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पडल्याची नोंद आहे. भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या दहा हजार १६७ गावांमध्ये अमरावतील विभागातील चार हजार ४० आणि नागपूर विभागातील दोन हजार ७६६ गावांचा समावेश आहे. मराठवाड्यातील एक हजार ६१६ आणि नाशिक विभागातील एक हजार ३९३ गावांतील भूजल पातळी एक मीटरपेक्षा जास्त घटली आहे. अमरावती (११०८ गावे), यवतमाळ (११७४), चंद्रपूर (८५५), अकोला (७९२) नांदेड (७६०), जळगाव (६९४), वाशीम (६७१), गोंदिया (५३५ गावे) या तालुक्यांतील स्थिती चिंताजनक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज