म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता कमी आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. सध्या १५ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, नऊ गावांनी टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. मागील वर्षी तब्बल तालुक्यातील १८७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
गेल्या वर्षी समाधानकार पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे भरलेले आहेत. त्यामुळे तुलनेने पाणी टंचाई कमी प्रमाणात असल्याचे जाणवत आहे. ग्रामसभेचा ठराव मंजूर झाल्यानंतर टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला जातो. संबंधित गावात पाण्याचे उद्भव आहेत का, सार्वजनिक विहिरी आहे का, नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध आहे का याची चाचपणी केल्यानंतर भूवैज्ञानिक अधिकारी यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांना 'प्रपत्र ब' सादर केले जाते. त्यानंतर उपअभियंता यांनी संबंधित गावाची आवश्यकता असल्यास पाहणी केली जाते. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहीने उपविभागिय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावांना टँकरसाठी मंजुरी दिली जाते.
सध्याच्या परिस्थितित बाहेगाव, मनूर व भगूर येथील प्रस्ताव उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्याकडे मंजुरीकडे पाठवण्यात आले असून, एकोडीसागज, जरूळ, बल्लाळीसागज व मनोली येथील प्रस्ताव उपअभियंता यांच्या पाहणीस्तरावर आहेत. शिवराई व बाभुळगाव खुर्द येथील टँकरच्या प्रस्तावासाठी तहसीलदार यांच्या पाहणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
\Bआठ एप्रिलपासून टँकर सुरू\B
आठ एप्रिलपासून तालुक्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या १५ गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही गावांना भटाणा येथील धरणातून तर, काही गावांना अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या राहेगाव सोनवाडी, उंदिरवाडी, जळगाव, अमानतपूरवाडी, लाखणी, मांडकी, मालेगाव कन्नड, शहाजतपूर, बाभुळगाव खुर्द, भायगाव गंगा, आघूर वाड्यावस्त्या, तिडी मकरमतपूरवाडी, पाथ्री व लोणी या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. शहाजतपूर व मालेगाव कन्नड या गावांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.