म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हरबऱ्याचे पैसे देण्यास शासनाला विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वादोन हजारच्यावर शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामात हरबरा खरेदी करण्यात आला. त्याची देणी सुमारे साडेदहा कोटींच्यावर असून अद्यापही एकाही शेतकऱ्यांचे पैसे झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
जाधववाडी येथील बाजार समिती आवार, पैठण, गंगापूर, वैजापूर तसेच खुलताबाद येथे शासनाने खरेदी केंद्र सुरू केले होते. हरबऱ्याला यंदा ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल अशी आधारभूत किमंतीत शासनाने जाहीर केली होती. २ हजार ५७६ शेतकऱ्यांनी हरबरा विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार २२८ शेतकऱ्यांचा एकूण २३ हजार ५४७ क्विंटल हरबरा या केंद्रावर खरेदी झाला. त्यापोटी सुमारे १० कोटी ३६ लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक आहे, पण माल खरेदी करुन अनेक दिवस झाले तरी शासनाने अद्यापही शेतकऱ्यांचे पेमेंट अदा केले नसल्याचे समोर आले आहे. खरिप पेरणींसाठी शेतकऱ्यांना पैशांची मोठी निकड असतानाही शेतकऱ्यांना मात्र हक्काच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
खरेदी केंद्राचे नाव - शेतकरी संख्या - हरबरा खरेदी (क्विंटल)
जाधववाडी ता. औरंगाबाद - १५७ - १५६५
पैठण - ६३६ - ७७४०
गंगापूर - ७७६ - ७९५६
वैजापूर - ३७४ - ३६९५
खुलताबाद - २८५ - २५९१
एकूण २२२८ - २३,५४७