म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद-वैजापूर रस्त्यावर अपघात स्थळाची माहिती घेण्यासाठी निघालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या पथकामुळे शिवूर येथील जिजामाता स्कुलच्या प्रवेशद्वारावर लावलेला एका बीअर बारचा बोर्ड अवघ्या पाच मिनिटात हटविण्यात आला. हा बोर्ड येथे पाच वर्षांपासून लावलेला होता.
आरटीओ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयाचे पथक मंगळवारी अपघात स्थळांची माहिती घेण्यासाठी निघाले होते. वैजापूर येथील शिवूर येथे जिजामाता हायस्कूल समोर हे पथक थांबले. या शाळेच्या प्रवेशद्वारावर बीअर बारचा मोठा बोर्ड होता. त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी चर्चा केली. त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच बीअर बारचा बोर्ड का लावला, अशी विचारणा केली. गेल्या पाच वर्षांपासून हा बोर्ड हटविण्यासाठी आम्ही लढा देत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. त्यामुळे पथकातील मोटार वाहन निरृीक्षकांनी वैजापूरचे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्याशी संपर्क करून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस निरीक्षकाला फोन गेल्याच्या अवघ्या पाच मिनिटांत एक व्यक्ती तेथे आला. त्याने प्रवेशद्वारावर चढून बीअर बारचा बोर्ड हटविला. हा बोर्ड हटविल्यानंतर आरटीओ निरीक्षकांच्या उपस्थितीत शाळेत रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. पथकातील अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. पाच वर्षांपासूनचा प्रश्न पाच मिनिटात निकाली काढल्याबद्दल या कार्यक्रमात आरटीओ आणि पोलिसांचे आभार मानण्यात आले.