इस्लामपूरनंतर वाय फायची सुविधा मिळणारे बीड शहर हे राज्यातील तिसरे शहर असणार आहे. शनिवारी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी शहरातील बशीरगंज भागात या सेवेची सुरुवात करण्यात आली.
बीड शहर हे साधारण दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल शहर असून स्मार्ट आणि डीजिटल शहराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. बीड नगरपालिकेने जिओ या कंपनीशी करार केला असून, या करारानुसार बीड शहर वाय फाय फ्री होणार असल्याची माहिती भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. विशेष म्हणजे नगरपालिकेस याचा एक रुपया खर्च येणार नसून, सर्व खर्च कंपनी उचलणार आहे. या करारानुसार सुरुवातीला बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, बशीरगंज, शाहू नगर, मोमीनपुरा, सुभाष रोड या पाच मोक्याच्या ठिकाणी वाय फाय फ्री सुविधा पुरवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागात ही सुविधा देणार असल्याचे ते म्हणाले. या सेवेचा फायदा शहरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरूणी, व्यावसायिकांना होईल. तसेच नगरपालिकेच्या अनेक सुविधा यामुळे ऑनलाइन उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. या वेळी नगराध्यक्षा दुधाळ व अनेक नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी जिओ कंपनीचे अधिकारी आजिम शेख म्हणाले, ‘बीड नगरपालिकेच्या वतीने या सुविधेसाठी एक वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. त्याला आता यश आले. या मोफत वाय फाय सुविधेसाठी कंपनी एक कोटी वीस लाख रुपये खर्च केला असून, बीड शहराला स्मार्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे.’ पत्रकार परिषदेनंतर बशीरगंज परिसरात या सेवेची सुरुवात करण्यात आली.