अ‍ॅपशहर

बहिणीच्या हातावरच्या मेहेंदीचा रंग उतरण्यापूर्वीच भावाचं टोकाचं पाऊल, कारण वडील म्हणाले...

सध्या लहान मुलांना रागावण्याआधी अनेकदा विचार करावा लागतो. कारण ते कधी काय करतील याचा काहीही नेम नाही. त्यांनी कुठली चूक केल्यास त्यांना कशा पद्धतीने समजावून सांगावं हा प्रश्नचिन्ह सध्या प्रत्येक पालकांपुढे आहे. लहान मुलांमधील रागाची भावना इतकी तीव्र झाली आहे की छोट्या-छोट्या गोष्टींचा देखील राग मनात ठेवून ते टोकाचा निर्णय घेतात. याचाच प्रत्यय सध्या बीडमध्ये आला आहे.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2023, 4:55 pm
बीड: शिक्षणासाठी परत बीडला जा, असे म्हणाल्याचा राग मनात धरून सातवीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sad Child


बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे प्रदीप अंगत साबळे या सातवीतील मुलाने आत्महत्या केली आहे. प्रदीप हा १३ वर्षांचा असून त्याने एका छोट्याशा कारणावरुन आत्महत्या केली आहे. अंगत साबळे यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सात दिवसांपूर्वी झाला होता. बहिणीच्या विवाहासाठी भाऊ प्रदीप हा बीडहून गावी आला होता.

विवाह सोहळा पार पडल्यानंतर वडील अंगत साबळे यांनी प्रदीपला बीडला शिक्षणासाठी जाण्यास सांगितलं. प्रदीपने बीडला शिक्षणासाठी जाण्यास नकार दिला. उलट वडील त्याला रागाने बोलले याचा राग मनात धरून तो थेट शेतात निघून गेला. या ठिकाणी प्रदीपने वेगळच पाऊल उचललं. प्रदीपने पीक राखणीच्या माळ्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा याबाबत त्याच्या घरच्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

इतक्या छोट्याशा कारणावरून प्रदीप इतकं टोकाचं पाऊल घेईल यावर साबळे कुटुंबाचा विश्वासच बसत नाहीये. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहताच घरातील प्रत्येकाने हंबरडा फोडला. अवघ्या सात दिवसांपूर्वीच मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. सात दिवसापूर्वी घरात लग्नाचा मंडप होता आनंद उत्सव होता. मात्र, सात दिवसानंतर संपूर्ण कुटुंबावर मुलाच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. याविषयी वडवणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख