अ‍ॅपशहर

'मी ३२व्या क्रमांकाची मंत्री नव्हते', पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका

पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होती. पंकजा यांच्या या भाषणानंतर दोघांमधील मतभेद संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 20 Dec 2021, 8:09 am
बीड : पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत. पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही, ते राज्यातील ३२व्या क्रमांकाचे मंत्री आहेत, या शब्दांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pankaja munde (1)


नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी वडवणी येथील सभेमध्ये त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'पालकमंत्री बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात नगर पंचायतीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतात, जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीला पाचशे कोटी देणार आहात तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय? जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कोणाला तुरुंगामध्ये टाकायचे, कोणाचे घर बरबाद करायचे असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही. तुरुंगामध्ये घालण्याची भाषा करणाऱ्यांनी आता थोडं थांबावे, आता बीड जिल्ह्यालाही किरीट सौमय्या मिळाले आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आमचं सरकार होतं, तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांत होते. मी काही ३२व्या क्रमांकाची मंत्री नव्हते. यांचे भविष्य फार चांगले नाही राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे.'

फडणवीस यांची स्तुती

दरम्यान, आष्टी येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्या म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो संयम आहे, तो शिकण्यासारखा आहे. आष्टी मतदारसंघात आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचे दोन गट आहेत. दोघेही मिळून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि नगर पंचायतीच्या ५०-५० टक्के जागा मागत होते. देवेंद्र फडणवीस संयमी आणि शांतपणे ऐकून घेत होते. मी म्हणाले, पन्नास टक्के जागा वाटून घेतल्यास समोरच्याचा फायदा होईल. त्यामुळे, तीनपैकी आष्टी एकाने लढवावी, पाटोदा दुसऱ्याने आणि शिरूर युती करून लढवावी.' पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होती. पंकजा यांच्या या भाषणानंतर दोघांमधील मतभेद संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज