अ‍ॅपशहर

World Sparrow Day : किलबिलाट कमी तरी संख्या स्थिर; चिमण्यांना ग्रामीण भागाचा आधार

world sparrow day : देशात सिक्कीम, राजस्थान, आसाम यासह काही भागांत आजही लोक परंपरागत राहत असल्याने तेथील चिमण्यांची संख्या स्थिर आहे.

महाराष्ट्र टाइम्स 20 Mar 2023, 10:13 am
पंकज मोहरीर, चंद्रपूर : शहरी भागात चिमण्यांच्या संख्येत घट असली, तरी ग्रामीण भागातील लोक आजही परंपरागत पद्धतीने राहत असल्याने तेथे चिमण्यांची संख्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अभ्यासकांच्या मते, १९९०च्या दशकानंतर मागील २२ वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या स्थिर आहे. दरम्यान मोठमोठ्या इमारती, खाद्याची कमतरता आणि घरे बांधण्यासाठी अधिवासासाठी कमतरता यामुळे चिमण्यांचा किलबिलाट निश्चित कमी झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Importance of Sparrows.
World Sparrow Day : किलबिलाट कमी तरी संख्या स्थिर; चिमण्यांना ग्रामीण भागाचा आधार


चिमणी हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे चिमणी हा सामान्यपणे मनुष्य वस्तीच्या शेजारी राहणारा पक्षी आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गाव तसेच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटची घरे उभी राहिली. १९९० ते २००० च्या दशकात चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. देशातील वन्यजीव संस्थांच्या विविध अहवालानुसार चिमण्यांची संख्या खूप समाधानकारक नाही. पण स्थिर आहे.

घरटे बांधायला लागणारे नैसर्गिक वनस्पती साहित्य घरालगत बगीच्यात मिळायला हवे. चिमण्यांची पिल्ले मोठी झाल्यावर कीटकांना खातात. त्यामुळे घराच्या बगीच्यातील रासायनिक कीटकनाशकांचा वापर थांबविणे तसेच कबुत्तर-कावळे व मांजर यांच्याही घरातील हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे पुणे येथील सृष्टी कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे उपसंचालक डॉ. गिरीश जठार यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

रासायनिक खताने खाद्य कमी

गुजरातमध्ये चिमण्यांचे मोठे थवे दिसतात. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश या देशाच्या मध्य भागातही चिमण्या अधिक दिसतात. मात्र, उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातील काही भागांत चिमण्यांची संख्या त्या तुलनेत घटली असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खतांचा वापराने चिमणीचे खाद्यच कमी झाले. त्याचा परिणाम संख्येवर होत असल्याचे उत्तराखंड येथे पक्षी संशोधन करणारे वरिष्ठ पक्षी वैज्ञानिक डॉ. रजत भार्गव यांनी सांगितले.

विदर्भात मोठ्या संख्येने चिमण्या

जमिनीवर पडलेले धान्य, बी, दाणे, इतकेच काय तर घरातील पोळय़ादेखील खाणारी ही चिऊताई पर्यावरणपूरक कामही करते. ज्या गावात घोडे, म्हशी जास्त तिथे चिमण्यांची संख्या जास्त असते. कारण या प्राण्यांच्या विष्ठेत न पचलेले धान्य त्या खातात. तसेच पिकांचा नाश करणाऱ्या कीटकांना खाऊन त्या शेतकऱ्यांच्या मित्रच बनल्या आहेत. राज्यात विदर्भात मोठ्या संख्येने चिमण्या असून पश्चिम महाराष्ट्रात वेगाने होणाऱ्या शहरीकरणाने तेथील काही भागातील संख्या कमी झाली आहे.

महत्वाचे लेख