अ‍ॅपशहर

VIDEO : पोराला वाचवण्यासाठी बाप पुराला भिडला; तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पाण्यातून मार्ग काढला

Chandrapur Flood : मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला खांद्यावर घेत पत्रुजी गिनघरे यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत शेजारचं गाव गाठलं आणि मुलावर उपचार करून घेतले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2022, 1:48 pm
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसलं आहे. पुराचा फटका बसलेल्या पोडसा गावातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chandrapur Flood
चंद्रपूर


वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. अशातच गावातील श्यामराव पत्रुजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला होता. तापाने तो फणफणत होता. मात्र गावात आरोग्य सुविधा नाही. दुसरीकडे शेजारच्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले. पण शेवटी बाप तो बापच. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला खांद्यावर घेत पत्रुजी गिनघरे यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत शेजारचं गाव गाठलं.

ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वालाच सुरुंग; शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट?

पोडसा गावापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर वेडगाव गाव आहे. तेथे खासगी डॉक्टर आहेत. या ठिकाणी कार्तिकवर उपचार करण्यात आले आणि पुन्हा पत्रुजी गिनघरे हे धो-धो बरसणाऱ्या पावसातून मार्ग काढत घरी पोहोचले. मुलाच्या उपचारासाठी घेतलेल्या या कष्टामुळे पत्रुजी गिनघरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला जात आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे पुन्हा एकदा आपल्या आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.



चंद्रपूर शहरातील ५९१ नागरिक सुरक्षित स्थळी हलवले

चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पूरग्रस्त भागातील ५९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलनी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहीद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५ , जेष्ठ नागरिक संघ येथे ४६ तर अग्रसेन भवन येथे १५ नागरिकांना ठेवण्यात आलं आहे.

महत्वाचे लेख