रामलीलातून होतोय संस्कृतीचा प्रसार : उत्तर प्रदेशातील मंडळी नागपूरच्या भेटीला; हवे रसिकांचे बळ
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
गंमत नव्हे, तीनेक तासांच्या त्या खेळात एकाच कलाकारानं एकाचवेळी तीन-चार भूमिकांत शिरणं. तेही, स्टेजच्या मागे जाऊन फटाफट मेकअप, वेशभूषा करून. मात्र, 'रामलीला' जिवंत करणारे हे कलावंत ही किमया लीलया साधतात. गेल्या पंचेवीस वर्षांपासून रामलीलाच्या माध्यमातून रामसंस्कृतीचा प्रसार करण्याचं काम ते अव्याहतपणे करीत आहेत. खंत ही आहे की, आजचं आभासी जग अधिक जवळ करणारे प्रेक्षक या जिवंत कलेकडे मात्र पाठ फिरवू लागले आहेत. कलेची सेवा करणाऱ्या या धुरंधरांवर त्याचा काही फरक पडलेला नाही. शेवटचा प्रेक्षक टिकून असेपर्यंत ही कला अन् संस्कृतीचा प्रसार करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे.
चार दिवस कुटुंब, मित्रमंडळींपासून दूर राहिले तर आपल्याला बायको- मुलाबाळांची ओढ लागते. कधी एकदा गाव गाठू, असे होते. पण, हे धाडस हे परप्रांतीय कलावंत सहज करतात. तेही धर्म, संस्कृतीच्या प्रसारासाठी. सांगूनही खरं वाटणार नाही, पण वर्षातले नऊ-नऊ महिने कुटुंबापासून दूर राहूनही कलेसाठी सचेत असलेला अग्रणी समाज म्हणजे ही रामलीला मंडळी. रामनामाचा जप करीत पाठीवर बिऱ्हाड घेऊन हे मंडळ देशभर फिरत असते. त्यापैकीच एक मंडळ सध्या नागपूरच्या मुक्कामी आलं आहे. रामकथेशिवाय जीवनात राम नसल्याचे त्यांची देहबोलीच सांगून जाते.
वाराणसी अर्थात काशी म्हणजे रामलीला मंडळांची जन्मभूमी. येथूनच चारशे वर्षांपूर्वी सुरू झालेला हा कलाप्रकार देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला. त्यापैकीच एक मंडळ म्हणजे माँ विंध्यांचल धाम रामलीला मंडळ. गेल्या सात दिवसांपासून हे मंडळ नंदनवन भागातल्या केडीके कॉलेजशेजारील शीतला माता देवस्थानच्या प्रांगणात मुक्कामाला आलं आहे. रामकथेचा जागर करण्यासाठी हे मंडळ कशी तयारी करते, हे अनुभवणंही रंजकच आहे.
पंडित धर्मदास महाराज हे मंडळाचे प्रमुख. वयाच्या आठव्या वर्षापासून ते रामलीला करतात. यात ते कधी राम, कधी लक्ष्मण, कधी सीता, कधी मंदोदरी तर कधी साक्षात रावणाचेही पात्र साकारतात. ते सांगत होते, तुलसीदासांच्या रामचरित मानसला अवधच्या बोलीभाषेचा लहेजा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य. वर्षातून नऊ महिने आम्ही कुटुंबासून दूर राहतो. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगडमधला असा एकही जिल्हा सुटला नाही, जिथं आम्ही रामलीला सादर केली नाही. म्हणजे नृत्य, नाट्य, गीत, संवाद, नेपथ्य आदीचा सुंदर मिलाप या रामलीलात पाहायला मिळतो. रामलीला या भक्तिनाट्यातून आम्ही मर्यादा पुरुषोत्तमाची महती गातो. रामलीला सुरू असताना कोणी माकडे होतात, कोणी महिला पात्र साकारतात तर कोणी दरबारी.
समोर स्टेज, मागे बिऱ्हाड
रामलीला सादर होत असताना स्टेजच्या पाठीमागे अनेक गमतीजमती घडत असतात. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करताना कलावंत एकामागून एक पोशाख उतरवत असतो. स्टेजवर धुमाकूळ घालणारा हनुमान क्षणात दशरथाच्या भूमिकेत शिरतो. तर रामाच्या भूमिकेतून क्षणात कोणी कुंभकर्णाच्या भूमिकेत जातो. तर कधी लक्ष्मणाच्या भूमिकेतून बाहेर येत शूर्पणखा समोर येते तर कुठे लक्ष्मणाला मूर्च्छित करणाऱ्या मेघनादाच्या भूमिकेतून बाहेर येत हनुमान समोर प्रकट होतो. स्टेजच्या पाठीमागे सुरू असलेली ही धावपळ मजेशीर असते.
पुरुषच साकारतात सर्व पात्रे
रामलीलात कधी रावण तर कधी मेघनाद साकारणारे मंगलदास मिश्रा सांगत होते, पौरोहित्याप्रमाणेच रामलीला हे उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांचे मुख्य काम. परंपरागत हा कलाप्रकार एका पिढीकडून दुसरी पिढी आत्मसात करते. विशेष म्हणजे यात क्वचित प्रसंगी महिला असते. बहुतांश सर्व पात्रे पुरुषच साकारतात. रंग, वेशभूषेला रामलीलात स्वतंत्र स्थान आहे. रामलीलेला सुरुवात होण्यापूर्वी तासंतास कलावंत भूमिकेत शिरण्यासाठी रंगरंगोटी करतात. 'रामायणी' हा स्वतंत्र कलावंत संच रामलीलेत असतो. तो कधी माकडे, सैनिक, कधी राक्षस तर कधी सर्वसामान्य जनता अशी कामे करतो.
स्वगतातून संवाद
रावणाचे पात्र साकारणारे सुरेंद्र शुक्ला सांगत होते, महर्षी व्यास हे रामलीलाचे दिग्दर्शक. धोतर, पांढरे मुंडासे घातलेला व्यासाच्या भूमिकेतील कलावंत रंगमंचावरील इतर कलावंतांच्या बाजूला बसून सूचना करतो. पात्रांचे संवाद हे 'स्वगत', 'खंडित स्वगत', 'आत्मगत' स्वरूपाचे असते. एखादा महत्त्वाचा संवाद पात्राने सादर केला तर त्याच्या पुष्ट्यर्थ 'बोल सियावर रामचंद्र की जय', असा जयघोष होतो. रामलीला सुरू असतानाच प्रेक्षकांमधून आवाज आला तरी कलावंतांची एकाग्रता भंगत नाही, उलट ते अधिक जोमाने संवाद सुरू ठेवतात. समोरच्या परिस्थितीवरून संवाद उत्स्फूर्त होतात, हेही रंजक असते. क्वचित प्रसंगी विद्यमान परिस्थितीवरही भाष्य होते.
रोज एकेका प्रसंगातून रामचंद्रांचे दर्शन
पाच, सात आणि अकरा दिवस अशा रीतीने रामलीला सादर होते. यात रामजन्मापासून ते वनवास, सीताहरण, शूर्पणखा, संजीवनी पर्वत, लंकादहन, कुंभकर्ण वध, राम-भरत भेटपासून ते लंकेश्वराचा वध आणि प्रभू रामचंद्रांचा अयोध्येतील राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग या रामलीलेतून कलावंत ज्वलंत करतात. रामनामाचा प्रसार हा या कथेचा केंद्रबिंदू असतो. रोज एकेका प्रसंगातून रामलीलेचे दर्शन घडविले जाते.
कलावंत जगावा...
पूर्वीच्या तुलनेत आता रामलीलाला गर्दी होत नाही, हे खरे आहे. कारण, आता सिनेमे, टीव्ही, मोबाइल अशी मनोरंजनाची बरीचशी साधनं आलेली आहेत. म्हणूनच या कलेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि संस्कृतीरक्षकांनी सुद्धा. मात्र, या कलेसाठी काहीतरी केले पाहिजे, ही कला आणि कलावंत जगले पाहिजेत, असं हळवं मतही हे कलाकार व्यक्त करतात.