संविधान बचाव समितीचे
साखळी उपोषण सुरूच
म. टा. वृत्तसेवा, धुळे
'सीएए' कायदा पारीत केल्यानंतर तसेच 'एनपीआर' व 'एनआरसी'चा मुद्दा सत्तारूढ पक्षातर्फे संसदेत मांडल्यापासून सातत्याने संपूर्ण देशातील संविधानप्रेमी, एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समुदाय संभ्रमात आहे. 'सीएए' कायदा रद्द करण्यात यावा यासाठी संविधान बचाव समितीतर्फे शहरातील उर्दू हायस्कूल आवारात ६ जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, ते सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याची ओरड आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा पूर्णत: रद्द करावा. तसेच यापूर्वीचा कायदा सक्षम असून, तो कायम ठेवावा. देशात निर्माण झालेली समस्या संभ्रम त्वरित संपवा. जामिया मिलीया इस्लामिया, जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगढ विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांकडून सदर कायद्याविरुद्ध झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेले बेकायदेशीर अत्याचारप्रकरणी पोलिसांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. सुनील लोंढे, ए. ओ. पाटील, मोहम्मद फारुख अशरफी, अॅड. उमाकांत घोडराज, बहुजन क्रांती मोर्चाचे आनंद शिंदे, अॅड. विशाल साळवे, श्रीकृष्ण बेडसे, राहुल वाघ, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी संघटनांचा यात सहभाग आहे.