नंदुरबारमध्ये करोनाचा शिरकाव
पहिला रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणा सतर्क; तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन
म. टा. वृत्तसेवा, धुळे
खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात करोना रुग्ण आढळल्यानंतर आता शुक्रवारी (दि. १७) रात्री उशिरा नंदुरबार जिल्ह्यातील एका व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या आदिवासी बहुल जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. करोनापसून वाचलेल्या नंदुरबारातही आता करोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि जिल्हा पोलिस प्रमुख महेंद पंडित यांच्यासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, नंदुरबारमधील वॉर्ड क्रमांक दहा हा परिसर 'प्रभावित क्षेत्र' म्हणून घोषित करीत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शनिवारपासून तीन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद केल्या आहेत.
जिल्हा यंत्रणेने पहिलाच रुग्ण सापडल्यानंतर आता शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सीमारेषेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, या करोनाबाधिताने मालेगाव ते नंदुरबार असा प्रवास केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली असून, संशयित व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा आता पोलिस यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, नंदुरबार शहरातील वार्ड क्रमांक दहामध्ये राहणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीला प्रकृती ठीक नसल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा शुक्रवारी (दि. १७) करोना तपासणीसाठी स्वॅब घेऊन धुळे शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आणले होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातदेखील आता करोनाने शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
...तर कडक कारवाई होणार
या वेळी जिल्हा प्रशासनाने तत्काळ शहरातील वार्ड क्रमांक दहामधील अली साहेब मोहल्ला परिसरातील एक किलोमीटरचा परिसर 'प्रभावित क्षेत्र' म्हणून घोषित केला. तसेच त्यालगतचा परिसरदेखील दोन किलोमीटरपर्यंत सील करून सर्व नागरिकांनी घरातच राहण्याचा सल्ला दिला. परिसरात संपूर्ण सॅनिटायझेशन करून निर्जंतूक केला असून, करोना संशयित व्यक्तीच्या परिवारातील सदस्यांसह नातेवाइकांना विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. करोनाचा प्रादूर्भाव शहरासह जिल्हाभरात पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी उद्या (दि. २०) एप्रिलपर्यंत शहरासह जिल्हाभरात संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. शहरात विनाकारण कोणीही फिरताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी दिला आहे.