परदेशातून आलेल्या तिघांसह चार संशयित
भुसावळातील डॉक्टर अत्यवस्थ; मंगलकार्यालये, लॉन्स बंदचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
परदेशातून आलेले पती-पत्नी, तसेच एक नागरिक यांच्यासह भुसावळातील एक डॉक्टर अशा चौघांना गुरुवारी (दि. १९) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील भुसावळ येथील डॉक्टर यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमूने प्रयोगशाळेत तपासणी पाठविण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी दिली. गुरुवारी (दि. १९) चार व बुधवारी (दि. १८) पाठवलेले पाच अशा ९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या संशयावरून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी (दि. १९) चार संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. यात भुसावळ येथील एक डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोल्हापूरवरून आले. त्यांना तेव्हापासून श्वास घेण्यास त्रास होता. त्यांची प्रकृती जास्त गंभीर झाल्याने त्यांना गुरुवारी खबरदारीसाठी रुग्णालयात दाखल करीत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यासह जळगावातील पती-पत्नी आठ दिवसांपूर्वी भूतान व इंडोनिशिया येथून टूर करून परतले. त्यांनादेखील त्रास जाणवून लागल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जळगावातील एक तरुण दुबई येथून परतला आहे. त्रास जाणवल्याने तोदेखील गुरुवारी रुग्णालयात दाखल झाला. या चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या प्राप्त होण्याची शक्यता आहे. बुधवारीदेखील चार संशयित रुग्णांचे नमुने पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाचीदेखील प्रतीक्षा असल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी, शहरातील मंगलकार्यालये, बँक्वेट हॉल तसेच लॉन्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
करोना प्रतिबंधासाठी मलेरिया विभाग सज्ज
शहरातील अस्वच्छता दूर करून औषधींची फवारणी योग्य प्रमाणात करण्यासाठी मलेरिया विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या. जळगाव शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव होऊ नये, जीव जंतूंचा नाश व्हावा यासाठी मलेरिया विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी बोलावली होती. या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, आरोग्य पर्यवेक्षक सुधीर सोनवाल यांच्यासह मलेरिया विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
मलेरिया विभागात मनपाचे ४० कर्मचारी असून सरासरी दररोज २८ कर्मचारी कामावर असतात. त्यांच्यामार्फत फवारणी, धुरळणी, अबेटिंग करण्यात येते. शहरात अंदाजे १ लाख २० हजार घरे असून एक कर्मचारी १०० घरांचे सर्व्हेक्षण करतो. दररोज १०० याप्रमाणे आठवड्यात सरासरी ६०० घरांचे सर्व्हेक्षण होते अशी माहिती त्यांनी दिली. मलेरिया विभागात सध्या औषधांचा साठा ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. पावसाळ्यात शहरात स्वच्छतेसाठी अतिरिक्त ६० माणसांची आवश्यकता भासणार आहे. तसेच ३०० लीटर अबेटिंग सोल्यूशन, ३०० लीटर सायफेनोथ्रीम आणि ४ वाहने आणि २० फवारणी पंप लागणार असल्याची माहिती मलेरिया विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करून मनपाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
आयएमए डॉक्टरांची 'आर्मी'
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी डॉक्टरांची आपत्कालीन बैठक बोलावून सर्व डॉक्टरांना कोविड -१९ (कोरोना) विरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत डब्लूएचओचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नंदापूरकर यांनी करोनाचे जगभरातील आजवरचे दूष्परिणाम आलेख आणि चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. 'प्रतिबंधात्मक उपचार' हाच या करोनाला थांबबविण्यासाठी खरा उपाय आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या आपण या आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. खोकला ताप, सर्दी अंगदुखी आणि परदेशातून आलेल्या, किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे आणि त्यांनी ही माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. उपचार करण्याऱ्या डॉक्टर, नर्स यांनी कशी काळजी घ्यावी, कोणता ड्रेस, मास्क, चष्मा घालावा याबद्दल माहिती दिली. संशयित रुग्णांना दवाखान्यात स्वतंत्र वाहनातून न्यावे, रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्यांना स्वतंत्र खोलीत उपचार करणे गरजेचे असते. त्यासाठी लागणारी औषधीबद्दलही डॉ. रवींद्र पाटील यांनी माहिती दिली. या वेळी अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांच्यासह शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
रेल्वे पोलिसांना मास्क वाटप
येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांना गुरुवारी मास्क वाटप करण्यात आले. तसेच प्रवाशांसाठी मदत कक्षाद्वारे कोरोना आजाराविषयी तपासणीदेखील करण्यात येत आहे. रेल्वेने दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्याकरिता रेल्वे पोलिस कर्तव्यावर असतात. प्रवाशांशी सतत त्यांचा संपर्क येत असतो. त्यामुळे गुरुवारी दूरक्षेत्र रेल्वे पोलीस, रेल्वे पोलिस फोर्सच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकूण १३८ मास्कचे वाटप शिवसेना कार्यकर्त्यांनी केले. या वेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र झेंडे, विराज कावडिया, अमित जगताप उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्क मंत्री संजय सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू आहे.