अ‍ॅपशहर

'सुरजागड प्रकल्प बंद झालाच पाहिजे'; नक्षलवाद्यांचा इशारा, रस्त्यावर वाहनांची जाळपोळ

बऱ्याच दिवसांपासून शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प बंद झालाच पाहिजे', असा इशारा त्यांनी दिला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 9:42 pm
गडचिरोली: बऱ्याच दिवसांपासून शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र हद्दीतील धोडराज ते इरपनार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ करीत गावात बॅनर लावून, पत्रके टाकून दहशत निर्माण करत सुरजागड प्रकल्प बंद होना चाहिये, अशी चेतावणी नक्षलवाद्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra gadchiroli naxal warning about stop surjagad project


प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून भामरागड तालुक्यात धोडराज ते इरपनार या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर असलेल्या जवळपास 20 वाहनांची 21 जानेवारी रोजी भर दुपारच्या सुमारास जाळपोळ केल्याची घटना घडली. जाळपोळ केलेल्या वाहनात 15 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 1 ग्रेडरचा समावेश आहे.

एका कंत्रादारांकडून पेटी कॉन्ट्रॅक्टने काम घेऊन अन्य कोणीतरी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 11 जानेवारी रोजी भामरागड तालुक्यातील नारगुंडा जंगल परिसरात दोन वन रक्षकांना नक्षल्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. आज पुन्हा त्याच तालुक्यात रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मरदिनटोला जंगल परिसरात 13 नोव्हेंबर रोजी पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षली नेता सेंट्रल कमिटी मेम्बर मिलिंद तेलतुंबडे, कंपनी 4 चा डिव्हीसीएम / कमांडर लोकेश उर्फ मंगु पोड्याम, कसनसूर दलम डिव्हीसीएम महेश शिवाजी रावजी गोटा, कोरची दलम कमांडर किसन उर्फ जैमनसह 27 नक्षल्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाला होता. गडचिरोली पोलीस दलाचा या कारवाईमुळे नक्षली चळवळीला खूप मोठा हादरा बसला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नगर विकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष गडचिरोलीत येऊन पोलिसांचे अभिनंदन केले.

या चकमकीनंतर बरेच दिवसांनी भामरागड तालुक्यात नक्षल्यांच्या हालचाली दिसून येत आहे. 11 जानेवारी रोजी वनरक्षकांना मारहाण केल्यानंतर 21 जानेवारी रोजी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ करून पुन्हा एकदा नक्षल्यांनी अस्तित्व दाखविले आहे. या जाळपोळीमुळे संबंधित कंत्राटदाराचे चांगलंच नुकसान झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज