अ‍ॅपशहर

भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक: एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली

Hingoli Car Accident : अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. परंतु सुदैवाने यावेळी कारमधील एअर बॅग उघडल्याने चौघे सुखरूप बचावले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2022, 10:34 am
हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरील दिग्रस फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिंगोलीकडून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. मात्र सुदैवाने यावेळी कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील चौघे सुखरूप बचावले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hingoli accident car
हिंगोली अपघात


मिळालेल्या माहितीनुसार, बोरजा येथील एक ट्रॅक्टरचालक हिंगोली येथून ट्रॅक्टरचे साहित्य खरेदी करून गावाच्या दिशेने जात होता. मात्र अचानक पाठीमागून कारने धडक दिल्याने ट्रॅक्टरचे व साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. एम. एच. ३८ एक्स ००३२ असा कारचा नंबर आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

'मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही'; राज ठाकरेंचा पठ्ठ्या ठरलेल्या दिवशी अयोध्येत पोहोचलाच

भरधाव कार चालवल्याने जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने कारचालकासह इतर प्रवाशांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यामुळे अपघाग्रस्तांची नावे कळू शकली नाहीत.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून अपघातांचे सत्र सुरू असून २५ ते ३० जणांनी अपघातात जीव गमावला आहे. अनेक कुटुंबातील तरुण युवक रस्ते अपघाताचे बळी ठरले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघात होत असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज