अ‍ॅपशहर

ग्रामपंचायत सदस्य निघाला दुचाकीचोर!

चोपडा तालुक्यातील अडावद येथील ग्रामपंचायतीचा सदस्यच दुचाकी चोर निघाल्याची घटना मंगळवारी (दि. ९) समोर आली आहे. त्याने आपल्या साथीदारासह गेल्या अडीच वर्षांत तब्बल २४ दुचाकी चोरल्या आहेत. दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, पोलिसांनी या दोघांकडून आत्तापर्यंत २१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जावेद खान हबीब खान (वय ४२, रा. अडावद) असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

Maharashtra Times 10 Oct 2018, 5:00 am
अडीच वर्षांत २४ दुचाकींची चोरी; एलसीबीकडून अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grapa sadasya


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

चोपडा तालुक्यातील अडावद येथील ग्रामपंचायतीचा सदस्यच दुचाकी चोर निघाल्याची घटना मंगळवारी (दि. ९) समोर आली आहे. त्याने आपल्या साथीदारासह गेल्या अडीच वर्षांत तब्बल २४ दुचाकी चोरल्या आहेत. दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, पोलिसांनी या दोघांकडून आत्तापर्यंत २१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जावेद खान हबीब खान (वय ४२, रा. अडावद) असे या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

जावेद खान याने बशीर अली समद अली (वय ३२, रा. शाहूनगर) व अन्य एका साथीदारासह बनावट चावीचा वापर करून सन २०१६ पासून जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १७ दुचाकी, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २ दुचाकी चोरल्या आहेत. पाचोरा, अमळनेर येथूनही या ग्रामसेवकाने दुचाकी चोरल्या आहेत. यामुळे आता ज्या ग्रामपंचायत सदस्याने आपल्या विकासकामांचा लेखाजोखा अडीच वर्षात द्यायला हवा, त्याच सदस्याने या अडीच वर्षात तब्बल २४ दुचाकी चोरी करून जनतेच्याच वस्तूवर हात साफ केला.

२४ दुचाकी चोरल्याची कबुली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, नुरोद्दीन शेख, मनोज दुसाने, नारायण पाटील, सुशील पाटील, योगेश पाटील, अशरफ शेख व गफूर तडवी यांच्या पथकाने सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य जावेद खान याला अटक केली. जावेद याच्याकडून माहिती घेतली असता बशी अली व आणखी एका साथीदाराची माहिती मिळाली. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली. यातील २१ दुचाकी पोलिसांनी सोमवारी रात्री हस्तगत केल्या. दोघांनाही जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

वागणुकीवरून पोलिसांना संशय
अडावदचा ग्रामपंचायत सदस्य जावेद खान हा काही महिन्यांपासून जास्तीची मौजमजा करीत होता. तो दर महिन्याला वेगवेगळ्या दुचाकी वापरत होता. त्याच्या वागणुकीमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मनोज दुसाने यांना त्याच्यावर संशय गेला. त्यांनी काही दिवस जावेद खानवर पाळत ठेवली. यानंतर जास्त तपास केल्यानंतर हा सर्व चोरीचा मामला समोर आला असून, ग्रामपंचायत सदस्याने जनतेचे प्रश्न न सोडवता चक्क दुचाकी चोरी करावी, याचीच चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. त्याच्या मजेशीर वागण्याने याबाबत खुलासा होऊ शकला हे विशेष.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज