अ‍ॅपशहर

जिल्ह्यातील ७४ पुलांवरून जीवघेणा प्रवास!

जिल्ह्यातील जिल्हा मार्ग आणि राज्य मार्गांवरील ७४ पुलांचे आयुष्य संपले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या पुलांचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

Maharashtra Times 16 Mar 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bridge issue in jalgaon district
जिल्ह्यातील ७४ पुलांवरून जीवघेणा प्रवास!


जिल्ह्यातील जिल्हा मार्ग आणि राज्य मार्गांवरील ७४ पुलांचे आयुष्य संपले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या पुलांचे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे आयुष्य संपलेल्या या पुलांवरून होणारी वाहतूक जीवघेणीच असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, राज्य सरकारने या पुलांबाबत अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.

जिल्हा मार्ग व राज्य मार्गांमध्ये नदी-नाल्यांवर पन्नास वर्षांपूर्वी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुलांचे बांधकाम केलेले होते. यातील अनेक पूल दगडी होते. पन्नास वर्षांपूर्वी वाहनांची संख्याही मर्यादित होती, तसेच वाहनेही पाच ते दहा टन क्षमतेची होती. ही वाहतूक पेलली जाईल, असे लक्षात घेऊनच त्या वेळी या पुलांचे बांधकाम केले गेले होते. मात्र पन्नास वर्षांत वाहनसंख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. त्याचबरोबर पाच टनांऐवजी चाळीस टनांची वाहने या रस्त्यांवरून धावू लागली आहेत. परिणामी, पूर्वी बांधण्यात आलेले हे पूल कालबाह्य ठरली असून, ती अवजड वाहने पेलण्यास सक्षम नाहीत. काही पूल खचण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी सावदा येथे पूल कोसळला होता.

तातडीची दुरुस्ती आवश्यक सावदा येथील पूल कोसळल्यानंतर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोष दिला होता. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंडळाने आपल्या अखत्यातीतील तिन्ही विभागांमार्फत जिल्हाभरातील पुलांचे सर्वेक्षण केले. जिल्ह्यात ७४ पूल जीर्ण झाले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. याबाबत वर्षभरापूर्वी राज्य सरकारला अहवाल पाठविण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली होती.

खर्च मोठा; निधी छोटा! सार्वजनिक बांधकाम खात्यास मर्यादित अल्प निधीतून पुलांची कामे पूर्ण करणे शक्य नसल्याचे सरकारला कळवले आहे. हे ७४ पूल धोकादायक अवस्थेत असून, यापूर्वी पुनर्बांधणी अथवा तत्काळ मोठी दुरुस्ती न केल्यास पूल कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विभागनिहाय जिल्ह्यातील जीर्ण पूल
उत्तर विभाग ः १९ जळगाव विभाग ः ४० अमळनेर विभाग ः १५ एकूण ः ७४

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज