अ‍ॅपशहर

वुई वॉन्ट कॅरिऑन!

अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॅरिऑन नियम लागू करावा, यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जावा, याकरिता एनएसयूआय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर सोमवारी (दि. २५) हजारो विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा नेण्यात आला.

Maharashtra Times 26 Sep 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम college students of engineering branch protest for carry on at nmu jalgaon
वुई वॉन्ट कॅरिऑन!


अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॅरिऑन नियम लागू करावा, यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जावा, याकरिता एनएसयूआय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर सोमवारी (दि. २५) हजारो विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वूई वॉन्ट कॅरीऑन’च्या घोषणा देत विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला होता. यानंतर एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू दालनात ठिय्या मांडला होता.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याने कुलगुरूंना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून कुलगुरूंनी उमवि संलग्नित अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या जुन्या व नव्या सीजीपीए अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरीऑन देण्यात यावे यासाठी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारी, आंदोलन करण्यात आले.

ठोस निर्णयच नाही

एनएसयूआयकडून करण्यात आलेल्या मागील आंदोलनाच्यावेळी प्र. कुलसचिव यांनी याबाबतचा निर्णय प्रधिकरणाच्या हाती असल्याचे सांगून निवडणुका झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आता निवडणुका होवून आठवडा झाला तरीही विद्यापीठ प्रशासनाने कॅरीऑन संदर्भात कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने हा धडक मोर्चा काढण्यात आला. यात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अभियांत्रिकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे तिसऱ्या वर्षाचे विषय उत्तीर्ण झाले आहेत. मात्र दुसऱ्या वर्षाचे एक किंवा दोन विषय नापास असल्याने त्यांना चौथ्या वर्षात प्रवेश मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान असल्याचेही आंदोलकांनी यावेळी सांगितले.

कुलगुरूंशी चर्चा

कॅरीऑनच्या निर्णयाबाबत याप्रसंगी कुलगुरू प्रा. पी. बी. पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी आंदोलक कुलगुरूंशी चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. प्रसंगी धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नांदेड व औरंगाबाद विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑनचा नियम लागू केला. परंतु, या नियमाबाबत नांदेड विद्यापीठाला राज्यपाल यांच्याकडून विचारणा होवून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूंनी चर्चा करण्यासाठी आलेल्या एनएसयूआयच्या शिष्टमंडळाला कॅरीऑनबाबत कुठलाही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज