अ‍ॅपशहर

'सरकार'कडे गेलो असतो तर घरी बसलो नसतो

जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आतापर्यंत सत्ता नसतानादेखील स्वत: सांभाळले. आता त्यांच्यासोबत सरकारमधील मोठे नेते आहेत. ते त्यांची काळजी घेतील. मी कुठल्याही गोष्टीसाठी सरकारकडे गेलो नाही म्हणून आज घरी बसलो, असा सणसणीत टोला माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (दि. ५) भाजपच्या जिल्हा बैठकीत लगावला. विरोधी पक्षात असताना निदान बोलण्याचे तरी स्वातंत्र्य होते, तेही सत्तेमुळे गेले, अशी एकामागे एक फटकेबाजीच खडसे यांनी बैठकीत केली.

Maharashtra Times 6 Jan 2017, 4:00 am
भाजपच्या जिल्हा बैठकीत आमदार खडसेंची फटकेबाजी; युतीचे समर्थन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath khadase firing speech at jalgaon
'सरकार'कडे गेलो असतो तर घरी बसलो नसतो


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आतापर्यंत सत्ता नसतानादेखील स्वत: सांभाळले. आता त्यांच्यासोबत सरकारमधील मोठे नेते आहेत. ते त्यांची काळजी घेतील. मी कुठल्याही गोष्टीसाठी सरकारकडे गेलो नाही म्हणून आज घरी बसलो, असा सणसणीत टोला माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (दि. ५) भाजपच्या जिल्हा बैठकीत लगावला. विरोधी पक्षात असताना निदान बोलण्याचे तरी स्वातंत्र्य होते, तेही सत्तेमुळे गेले, अशी एकामागे एक फटकेबाजीच खडसे यांनी बैठकीत केली.

जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाची जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत खडसे यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या शैलीत शेरेबाजी करीत नाराजीही व्यक्त केली. अनेक ठिकाणी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनादेखील टोले हाणले.

‘युती करा, मला आनंद आहे’

बैठकीत गिरीश महाजन यांनी शक्य तेथे युती करू, असे म्हटल्याचा धागा पकडत खडसे यांनी युती कराच मला अडचण नाही, आनंदच आहे, असा टोलाही खडसेंनी हाणला. युती झाल्यावर ७० पैकी ६० जागा मिळाल्यास तसे सांगता येते. जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादीला नेस्तानाबूत करण्यासाठी त्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्तेत सांभाळून बोलावे लागते

जिल्हा परिषद निवडणूक ही खरी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना त्यासाठी बळ देण्याची गरज असल्याचे खडसे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षात सांभाळून बोलावे लागते त्यामुळे सत्ता असताना यश मिळवणे आव्हान असते. कधीकधी असे वाटते विरोधात असताना बोलण्याचे तरी स्वातंत्र्य होते, असेही खडसेंनी सांगितले.

ज्यांना पक्षाची माहिती नाही त्यांना लाल दिवे

या बैठकीत बोलताना, गिरीश महाजन यांनी विजयाची खात्री असलेले बाहेरचे उमेदवार आणण्याचे समर्थन केले होते. त्या पार्श्वभूमीवर खडसेंनी हरकत नाही, असे बाहेरचे उमेदवार घेणे आवश्यक असल्याचे सांगत समर्थन केले. मी १९९० मध्ये एकटाच निवडणुकांसाठी फिरायचो, आता खूप नेते आहेत. सत्तेमुळे बारीक कार्यकर्ता जाड झाला असून मोटार सायकलीच्या जागी कार आल्यात. ज्यांना पक्षाची माहिती नव्हती त्यांना लाल दिवे आलेत, असा टोलाही त्यांनी लगावला. वीस वर्षे राहूनही विजय मिळविता येत नसेल तर बाहेरचा उमेदवार स्वीकारण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाहेरचे लोक घेताना चांगले घ्या. चोर, डाकू किंवा काल कारागृहातून सुटलेल्यांना मंत्री करू नका, असा टोला शेवटी खडसेंनी हाणला.

महाजनांनी केलेल्या, मैत्री जर दूर ठेवली तर यश येईल या वक्तव्याचाही खडसेंनी समाचार घेतला. त्यांनी महाजन यांना, मैत्री जरा कमी करावी असे सांगत, इतक्या वर्षात मी पक्ष व मैत्री वेगळी ठेवली आहे. प्रथम प्राधान्य पक्षाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून जळगाव जिल्हा त्यांना नवा नाही पण माहेरी जास्त राहू नका जास्त प्रेम चांगले नसते, असा टोला लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज