अ‍ॅपशहर

एफडीएकडून ८ लाखांचा गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी स्टेशन रोडजवळील ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर छापा टाकून ८ लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.

Maharashtra Times 26 Jul 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IMG-20180725-WA0021


अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी स्टेशन रोडजवळील ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर छापा टाकून ८ लाख रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागास जळगाव शहरात प्रतिबंधित पदार्थाचा साठा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सकाळी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यो. कों. बेंडकुळे व अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील संबंधित ठिकाणी दबा धरून बसले होते. सकाळी १० वाजता श्री बालाजी मोरे ट्रॅव्हल्स कार्यालयासमोर झाडाखाली संशयित प्लास्टिकची खोके व पोती आढळून आले. काही वेळाने घटनास्थळी सदर मालाचा ताबा घेणारी व्यक्ती संशयित दिलीप रमेश बदलानी आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता हा माल त्यांच्या मालकीचा असल्याचे त्यांनी कबूल केले. या मालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्लास्टिक कोटेड १९ बॉक्समध्ये केशरयुक्त पानमसालाचे प्रत्येकी १५४ ग्रॅमचे एकूण ३ हजार ८०० पाकिटे आढळून आली. तसेच प्लास्टिकच्या दोन पोत्यांमध्ये तंबाखूचे २ हजार पाकिटे आढळून आली. सदर मालाची एकूण किंमत ७ लाख ७६ हजार रुपये अशी आहे. या कारवाईनंतर शहरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जामदेत दोन गटांत हाणामारी
धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामदे येथे आर्थिक व्यवहाराच्या देवाण-घेवाणीतून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्यांचा वापर केला. जामदे परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी मांडूळ साप विकण्याचा बहाणा करून लुटीचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. तसेच रस्ता लूट, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रकारही या भागात नेहमी होतात. अशाच प्रकारातून मध्य प्रदेशातील काही लोक जामदे परिसरात आले असताना गावातील काही मंडळींसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून दोन्ही गट एकमेकांवर चालून गेले. त्यातून हाणामारी होऊन एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील शरद भानूसिंग पवार (२०) यास रात्री उशिरा पोलिसांनी साक्रीत आणून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर मध्यरात्री जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, घटनेचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसले तरी मांडूळ तस्करी किंवा चोरीच्या भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याच्या कारणातून हा वाद झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तरुणाची आत्महत्या
रावेर : ऐनपूर येथील रवींद्र विठ्ठल पाटील (वय ३४) याने बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील नागझिरी नदीलगत असलेल्या आसराबर्डीजवळ खदानीच्या डोहात उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत भगवान सखाराम सुरदास यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज