अ‍ॅपशहर

एकसंघ होत वाढवावी राष्ट्रवादाची भावना

पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्र्य आणि बेरोजगारी लपविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशावेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे आवाहन सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.

Maharashtra Times 12 Sep 2018, 5:00 am
सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_4114 copy


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्र्य आणि बेरोजगारी लपविण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशावेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे आवाहन सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी निवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांचे ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, विशेष संदर्भ सीमेपलिकडील दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव भ. भा. पाटील होते.

डॉ. बक्षी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्ती नंतर काश्मीरदेखील भारतात विलीन झाला होता. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा दिला गेल्यामुळे काश्मीर समस्या अधिक बिकट होत गेली. भारतीय सैन्याने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र रणांगणात जिंकूनही राजकीय तहात मात्र आपण पराभूत झालो. या प्रश्नावर सार्वमत घ्यायला भारताची तयारी आहे, परंतु पाकिस्तानची तयारी नाही, असेही डॉ. बक्षी म्हणाले.

अलिकडच्या काळात सैन्यावर दगडांचा मारा करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कारण पाकिस्तान रणांगणातील युद्ध लढू शकत नाही. अशावेळी काश्मीरमधील मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्र निर्माण केले जात आहे. हा प्रश्न सुटू शकत नाही याची पाकिस्तानलादेखील कल्पना आहे. मात्र, तो सुटू नये हीच त्या देशाची इच्छा आहे, असा आरोपही डॉ. बक्षी यांनी केला. कारण त्यातून निधी उभा राहतो आणि शस्त्र घेता येतात. जम्मू-काश्मीरमधील कुणालाही स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती नको आहे. केवळ काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी स्वतंत्रतेची मागणी केली जात आहे. पण ते शक्य नाही असे सांगून डॉ. बक्षी यांनी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक केंद्राचे विभागप्रमुख प्रा. आर. बी. गोरे यांनी केले. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. अनिल डोंगरे यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज