अ‍ॅपशहर

गाळे लवकरच ताब्यात

मनपा मालकीच्या २८ पैकी १८ व्यापारी मार्केटमधील २१७५ गाळ्यांची मुदत दि. ३१ मार्च २०१२ मध्ये संपुष्टात आली होती. या गाळेप्रकरणी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दि. १४ जुलै रोजी कामकाज झाले होते.

Maharashtra Times 27 Jul 2017, 4:00 am
२१७५ गाळ्यांबाबत औरंगाबाद खंडपीठाचे आदेश मनपाला प्राप्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalgaon 18 markets shops issue
गाळे लवकरच ताब्यात


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मनपा मालकीच्या २८ पैकी १८ व्यापारी मार्केटमधील २१७५ गाळ्यांची मुदत दि. ३१ मार्च २०१२ मध्ये संपुष्टात आली होती. या गाळेप्रकरणी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दि. १४ जुलै रोजी कामकाज झाले होते. यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने गाळ्यांचा ताबा घेण्याचे आदेश मनपाला बुधवारी (दि. २६) प्राप्त झाले आहेत. आदेशात संबंधित गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या २८ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलांची मुदत दि. ३१ मार्च २०१२ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे गाळे पुन्हा कराराने देण्याबाबत १३५ क्रमांकाचा ठराव करण्यात आला होता. परंतु, या मार्केटमधील काही गाळेधारकांनी त्या ठरावावर हरकत घेतली. तसेच कराराची मुदत संपल्यानंतरही गेल्या पाच वर्षांपासून गाळे धारकांच्याच ताब्यात हे संबंधित गाळे आहेत. ते गाळे ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी ८१ ब ची प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये तत्कालीन आयुक्तांनी गाळेधारकांना नोटीसही बजावली होती. परंतु, या नोटीसच्या विरोधातही गाळेधारकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जळगाव मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गाळे ताब्यात घ्यावे, अशी जनहित याचिका दाखल केली. फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीबाबत आणि अटीशर्तीचे भंग केल्यामुळे व्यापारी संकुलांची जागा ताब्यात का घेऊ नये? यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या नोटीसच्या विरोधात स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, माजी स्थायी सभापती नितीन बरडे आणि माजी उपमहापौर सुनील महाजन यांनीही याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका एकत्र करीत औरंगाबाद खंडपीठात दि. १४ जुलै २०१७ रोजी कामकाज होऊन गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया राबविण्याचा निकाल दिला होता. या निकालाबाबतचे आदेश महापालिकेला बुधवारी (दि. २६) प्राप्त झाले.

या संकुलांतील गाळ्यांचा समावेश

शहरातील महात्मा फुले व्यापारी मार्केट, सेंट्रल फुले व्यापारी मार्केट, रामलाल चौबे व्यापारी मार्केट, भोईटे व्यापारी मार्केट, जुने बी. जे. व्यापारी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी मार्केट, वालेचा व्यापारी मार्केट, नवीन छत्रपती शाहू महाराज व्यापारी मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने, महात्मा गांधी व्यापारी मार्केट, भास्कर व्यापारी मार्केट, रेल्वे स्टेशन चौकाजवळील व्यापारी मार्केट, नानीबाई अग्रवाल व्यापारी मार्केट, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत व्यापारी मार्केट, जुने शाहू महाराज व्यापारी मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, धर्मशाळा व्यापारी मार्केटचा समावेश आहे.


असे आहेत आदेश

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व व्यापारी संकुलांबाबत एकसमान कारवाई करायला हवी. एकदा गाळेधारकांची करारनाम्याची मुदत संपली असता, मनपा अधिनियमानुसार जोपर्यंत त्याचे नूतनीकरण होत नाही तोपर्यंत कोणीही कुठल्याही कारणाने गाळ्यांचा वापर सुरू ठेवण्यास गाळेधारक पात्र नाही. तसेच त्यांनी नियमितपणे भाडे न भरल्याने त्यांना याबाबत दिलासा देण्याचे कुठलेही कारण दिसत नसल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. संबंधित आदेश प्राप्त झाल्यापासून जळगाव महापालिकेने पंधरा दिवसांत सुरू करावी तसेच दोन महिन्यांच्या आत गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज