अ‍ॅपशहर

चोखंदळ वाचकांमुळेच मराठी साह‌ित्य समृद्ध

मराठी वाचक अनुभवी आणि चोखंदळ असतात. त्यामुळे वाचक हेच खऱ्या अर्थाने प्रतिभावंत आहेत.

Maharashtra Times 21 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi literature great due to choosy readers
चोखंदळ वाचकांमुळेच मराठी साह‌ित्य समृद्ध


मराठी वाचक अनुभवी आणि चोखंदळ असतात. त्यामुळे वाचक हेच खऱ्या अर्थाने प्रतिभावंत आहेत. अशा वाचकांमुळेच मराठी साहित्य समृद्ध आहे. यामुळे साहित्य लेखकांची जबाबदारी वाढली असल्याचा असा सूर परिवर्तनतर्फे आयोजित ‘आम्ही सध्या काय वाचतो’ चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्रात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त तथा ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके, ग्रामीण साहित्यिक राजन गवस, लेखक व प्रकाशक संजय जोशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा समावेश होता. व्यासपीठावर अॅड. विजय पाटील, परिवर्तनचे शंभू पाटील उपस्थित होते.

कथा, कादंबऱ्यांतून वास्तवतेचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो. साहित्य हे समाजाशी, माणसांशी निगडीत असते. त्यामुळे साहित्य चिरकाल टिकणारे असावे. इंटरनेटमुळे वाचन संस्कृती वाढली असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके यांनी मांडले.

मराठी भाषा ही समृद्ध आहे. वाचकांमुळेच लेखकाची जबाबदारी वाढली आहे. वाचकांना जे आवडेल तेच लेखकांनी लिहायला पाहिजे. लेखक आणि वाचक हे एकाच जातीचे असतात, असे म्हणत इंग्रजीतून ज्ञान मिळत नाही. मराठीतूनच ज्ञान मिळते. त्यामुळे मराठी भाषा हीच ज्ञानभाषा आहे, असे मत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

जुने साहित्य आपण सहसा वाचत नाही, अशी खंत साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केली. जुने साहित्य वाचायला हवे. कारण त्यातून इतिहासाचा बोध होतो. कृष्णाजी केळुसकर यांनी लिहिलेले चरित्र वाचायला हवे, असे मत देखील गवस यांनी व्यक्त केले.

वाचनामुळे समृद्धी

वाचन संस्कृतीबाबत अनेक गैरसमज पसरवले जात असल्याचे प्रकाशक संजय जोशी यांनी सांगितले. वाचन संस्कृती कमी झालेलीच नाही, असे ठामपणे सांगून वाचकांपर्यंत पोहचायला प्रकाशक आणि विक्रेते कमी पडत असल्याची भूमिका जोशी यांनी विषद केली. वाचनामुळे मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. पूर्वीच्या साहित्यातील अस्तित्ववाद आणि आताचे अस्तित्ववादी साहित्य यात खूप तफावत आहे, असे सांगून ज्यामुळे द्वेष निर्माण होईल, असे साहित्य वाचू नये, असे स्पष्ट मत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केले. तसेच साहित्यातून विशाल मानवतावाद निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक शंभू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज