अ‍ॅपशहर

रिंगरोडच्या अतिक्रमणांवर हातोडा

जळगाव शहरातील रिंगरोडवर दोन्ही बाजूंनी गेल्या काही वर्षात संरक्षक भिंती व शेडचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून हा रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत या रस्त्यावर मार्किंग करण्यात येणार असून, अतिक्रमित बांधकामे काढण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 4 Sep 2018, 4:00 am
रस्ता मोकळा करणार; दोन दिवसांत मनपाकडून मार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DSC_7602


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरातील रिंगरोडवर दोन्ही बाजूंनी गेल्या काही वर्षात संरक्षक भिंती व शेडचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून हा रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत या रस्त्यावर मार्किंग करण्यात येणार असून, अतिक्रमित बांधकामे काढण्यात येणार आहेत.

जळगाव महापालिकेला शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी नगरोत्थान योजनेतून मिळाला आहे. या निधीतून जळगाव शहरातील मुख्य रस्ते मोकळे करून त्यांना फूटपाथ तयार करण्यात येणार आहे. यात शहरातील सर्वात महत्त्वाचा असलेल्या रिंगरोडवरही फूटपाथ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हा रस्ता मोकळा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

२४ मीटरचा रस्ता २० मीटरपेक्षा कमी
रिंगरोड हा टाऊन प्लानिंगमधील २४ मीटरचा रस्ता आहे. या रस्त्याला दुभाजक असला तरी रस्त्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी व व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकामाद्वारे रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. दोन्ही बाजूने अनेक ठिकाणी ३ ते ५ मीटरपर्यंतचे अतिक्रमण करण्यात आले आहे. यात संरक्षक भिंती, शेड तर काहींनी ओटे तयार केल्याने रस्ता लहान झाला आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती, शेड व ओट्यांचे अतिक्रमण तर आहेच पण त्यापुढे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनेदेखील लावली जातात. त्यामुळेही रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याचे आवाहन
महापालिका प्रशासनाकडून हा रस्ता गणेशोत्सवापूर्वी मोकळा करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत पिंप्राळा रेल्वेगेटपासून ते कवयित्री बहिणाबार्इ उद्यानापर्यंत रिंगरोडच्या दोन्ही बाजूला रस्त्यांची सीमा पाहून तेथे मार्किंग करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच दोन्ही बाजूचे रस्त्यावर आलेले मार्किंगमधील अतिक्रमणदेखील काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त चंद्राकांत डांगे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. या भागातील नागरिक व व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहनही आयुक्त डांगे यांनी केले आहे. अन्यथा, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवार्इ करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज