महापालिकेचे नियोजन शून्य; पुन्हा पुरसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
अवघ्या महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असतानाही महापालिकेला त्याचे सोयरसुतक दिसत नाही. उपनाल्यांची सफाईची कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रभाग अधिकाऱ्यांकडून मुख्य पाच नाल्यांच्या सफाईला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास जळगावकरांना पुन्हा पुरसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील काही पडक्या इमारती धोकादायक झाल्या असून, त्याबाबतदेखील महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.
शहरात २३ किमी. लांबीचे पाच मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ७० उपनाले आहेत. सफाईच्या मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येणारी नालेसफाईची कामे सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी मागच्या महिन्यातच दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील ७० उपनाल्यांची (लहान) सफाई आरोग्य विभागाकडून करावी तर शहरातील मुख्य पाच नाल्यांची सफाई चार प्रभाग अधिकाऱ्यांनी जेसीबीसह यंत्रणा भाडे तत्त्वावर घेऊन करण्याचे ठरले होते. या चारही प्रभागांसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्य नाल्यांची सफाई केव्हा?
आरोग्य विभागाने पालिकेच्या जेसीबीने उपनाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, मुख्य नाल्यांच्या सफाईला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. मे महिन्याच्या दुसरा आठवडा आला आहे. असे असतानाही जेसीबी भाड्याने घेऊन काम का सुरू झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालेसफार्इसाठी मक्ते काढण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आतापर्यंत नालेसफाई पूर्ण करणे अपेक्षित असताना प्रभाग अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या कामास सुरुवातच झाली नाही.
पडक्या इमारतींचा धोका कायम
शहरातील अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल १०८ पेक्षा जास्त इमारती आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची ‘औपचारिकता’ महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे पार पाडणार आहे. मात्र, ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याची परंपरेचा प्रशासन व इमारतमालक यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने याठिकाणी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरवर्षी महापालिका इमारतमालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
मटा भूमिका
अनेक वर्षे आपत्ती व्यवस्थापनात सपाटून मार खाल्लेल्या महापालिकेने यंदाही मान्सूनपूर्व तयारी प्रभावीपणे सुरू केलेली नाही. अतिवृष्टीमुळे लेंडी नाल्याच्या पुराने ममुराबाद रस्ता दिवसभर बंद राहिला होता. गेल्या पावसाळ्यात खंडेराव नगरातील पूल दोनवेळा वाहून गेल्याने या भागातील संपर्कच तुटला होता. शाहूनगरातील व मेहरूण परिसरात गटारींचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये घुसले. या पार्श्वभूमीवर दीड महिन्याअगोदर प्रत्यक्ष कारवाईच्या सूचना देऊनही प्रभाग अधिकारी कुंभकर्णासारखी झोप काढत आहेत. अशा परिस्थितीत जळगावकर वेठीस धरले जात असून, या ढीम्म प्रशासनाने आतातरी जागे होत नालेसफाई सुरू करावी हीच अपेक्षा.
शहरातील प्रमुख नाले
...मेहरूण ते ममुराबाद
...मानराज मोटर्स ते खेडी
...रामदास कॉलनी ते चंद्रप्रभा कॉलनी
...समता नगर ते दीपक फूड्स
...इकबाल कॉलनी
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
अवघ्या महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असतानाही महापालिकेला त्याचे सोयरसुतक दिसत नाही. उपनाल्यांची सफाईची कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रभाग अधिकाऱ्यांकडून मुख्य पाच नाल्यांच्या सफाईला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास जळगावकरांना पुन्हा पुरसदृश्य परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील काही पडक्या इमारती धोकादायक झाल्या असून, त्याबाबतदेखील महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.
शहरात २३ किमी. लांबीचे पाच मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ७० उपनाले आहेत. सफाईच्या मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येणारी नालेसफाईची कामे सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी मागच्या महिन्यातच दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील ७० उपनाल्यांची (लहान) सफाई आरोग्य विभागाकडून करावी तर शहरातील मुख्य पाच नाल्यांची सफाई चार प्रभाग अधिकाऱ्यांनी जेसीबीसह यंत्रणा भाडे तत्त्वावर घेऊन करण्याचे ठरले होते. या चारही प्रभागांसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्य नाल्यांची सफाई केव्हा?
आरोग्य विभागाने पालिकेच्या जेसीबीने उपनाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, मुख्य नाल्यांच्या सफाईला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. मे महिन्याच्या दुसरा आठवडा आला आहे. असे असतानाही जेसीबी भाड्याने घेऊन काम का सुरू झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालेसफार्इसाठी मक्ते काढण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आतापर्यंत नालेसफाई पूर्ण करणे अपेक्षित असताना प्रभाग अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या कामास सुरुवातच झाली नाही.
पडक्या इमारतींचा धोका कायम
शहरातील अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल १०८ पेक्षा जास्त इमारती आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची ‘औपचारिकता’ महापालिका प्रशासन नेहमीप्रमाणे पार पाडणार आहे. मात्र, ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याची परंपरेचा प्रशासन व इमारतमालक यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने याठिकाणी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरवर्षी महापालिका इमारतमालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
मटा भूमिका
अनेक वर्षे आपत्ती व्यवस्थापनात सपाटून मार खाल्लेल्या महापालिकेने यंदाही मान्सूनपूर्व तयारी प्रभावीपणे सुरू केलेली नाही. अतिवृष्टीमुळे लेंडी नाल्याच्या पुराने ममुराबाद रस्ता दिवसभर बंद राहिला होता. गेल्या पावसाळ्यात खंडेराव नगरातील पूल दोनवेळा वाहून गेल्याने या भागातील संपर्कच तुटला होता. शाहूनगरातील व मेहरूण परिसरात गटारींचे पाणी ओव्हरफ्लो होऊन घरांमध्ये घुसले. या पार्श्वभूमीवर दीड महिन्याअगोदर प्रत्यक्ष कारवाईच्या सूचना देऊनही प्रभाग अधिकारी कुंभकर्णासारखी झोप काढत आहेत. अशा परिस्थितीत जळगावकर वेठीस धरले जात असून, या ढीम्म प्रशासनाने आतातरी जागे होत नालेसफाई सुरू करावी हीच अपेक्षा.
शहरातील प्रमुख नाले
...मेहरूण ते ममुराबाद
...मानराज मोटर्स ते खेडी
...रामदास कॉलनी ते चंद्रप्रभा कॉलनी
...समता नगर ते दीपक फूड्स
...इकबाल कॉलनी