अ‍ॅपशहर

उमवि प्राधिकरणाचे निकाल घोषित

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राधिकरणाच्या व्यवस्थापन मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील, डॉ. सुभाष चौधरी, भरत माळी, अॅड. संदीप पाटील विजयी झाले आहेत.

Maharashtra Times 20 Sep 2017, 4:00 am
आमदार डॉ पाटील यांच्यासह अॅड. संदीप पाटील, डॉ. सुभाष चौधरी, भरत माळी विजयी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम north maharashtra university authorization committee election result declared
उमवि प्राधिकरणाचे निकाल घोषित


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राधिकरणाच्या व्यवस्थापन मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील, डॉ. सुभाष चौधरी, भरत माळी, अॅड. संदीप पाटील विजयी झाले आहेत. तर विद्यापीठ शिक्षक गटातून प्रा. भूषण चौधरी विजयी झाले. महाविद्यालयीन शिक्षकांमधून गौतम कुवर, मोहन पावरा व सुनील गोसावी, किशोर कोल्हे निवडून आले. उर्वरित जागांसाठी मतमोजणी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सुरुच होती.

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यात व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, विद्या परिषद अशा एकूण १८ व अभ्यास मंडळाच्या १० अशा एकूण २८ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात मतमोजणीला सुरुवात झाली.

सुरुवातीला विद्यापीठ शिक्षक गटाचा निकाल जाहीर झाला. या गटात प्रा. भूषण चौधरी व प्रा. अनिल डोंगरे यांच्यात लढत होती. विद्यापीठ शिक्षक गटासाठी ८२ मतदान झाले होते. विजयी उमेदवाराला किमान ४१ मते आवश्यक होती. यात जैवशास्त्र प्रशाळेचे प्रा. भूषण चौधरी यांना ५१ तर व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या प्रा. अनिल डोंगरेंना ३० मते मिळाली. यापूर्वी प्रा. अजय सुरवाडे व प्रा. मधुलिका सोनवणे बिनविरोध झाल्या आहेत.

आमदार डॉ. पाटलांच्या विजयावर आक्षेप

व्यवस्थापन मंडळाच्या चार जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. या चार जागांसाठी ८६ मतदानातून एक मत बाद झाल्याने ८५ मतदान शिल्लक होते. त्यामुळे १८ जादुई आकडा असल्याने पहिल्या फेरीतच अॅड. संदीप पाटील यांना २१ मते व भरत माळी यांना १९ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर पहिल्या फेरीत डॉ. सतीश पाटील यांना १७ मते, डॉ. सुभाष चौधरी यांना १५ तर महेश घुगरी यांना १३ मते मिळाली. यावेळी संदीप पाटील व भरत माळी यांची मते वाटण्यात येणार होती. अॅड. पाटील यांना जास्त मते असल्याने त्यांची मते अगोदर वाटायला हवी होती. परंतु, निवडणूक प्रतिनिधींनी भरत माळी यांची मते अगोदर वाटली. यात डॉ. सतीश पाटील विजयी झाले. दरम्यान, अभाविपचे दिलीप रामू पाटील यांनी यावर आक्षेप नोंदवून जास्त मते अगोदर वाटायला हवी होती, असे सांगितले. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ झाला होता. दुसर्‍या फेरीत डॉ. सतीश पाटील यांना ८ मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर दुसर्‍या फेरीतील मतांचे विभाजन होऊन डॉ. सुभाष चौधरी यांना १.१२ मुल्य तर महेश घुघरी यांना १.८७ मुल्य देण्यात आले. महेश घुघरी यांना अगोदरचे १३ व नंतर १.८७ असे एकूण १५ मते मिळाली तर डॉ. सुभाष चौधरी यांना अगोदरची १५ मते व नंतरचे १.१२ मते मिळाल्याने त्याची १६ मते झाल्याने डॉ. सुभाष चौधरी विजयी झाले.

माघारीसाठी दबाव

विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अर्ज दाखल केल्यानंतरदेखील माघारीसाठी वरिष्ठ स्तरावरून दबाव आणला होता. परंतु, आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यामुळे अधिक चुरस निर्माण होवून अखेर या निवडणुकीत विजयी झालो. यापुढे विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच संस्थाचालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज