अ‍ॅपशहर

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

महामार्गावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ९.४५ वाजता इच्छादेवी चौकाजवळ घडली.

Maharashtra Times 27 Dec 2018, 5:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one woman chain snatching incident at jalgoan
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली


महामार्गावरून दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ९.४५ वाजता इच्छादेवी चौकाजवळ घडली.

हर्षा योगेश महाजन (वय ३७, रा. भूषण कॉलनी, गिरणा पाण्याची टाकी) या मंगळवारी रात्री ७ वाजता सासू मंदाकिनी लक्ष्मण महाजन यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १९ डीए ५१७५) कमल पॅराडाईज येथे नातेवाइकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. तेथून घरी परत जात असताना अजिंठा चौफुलीपासून ट्रीपलसीट असलेले भामटे हर्षा यांच्या दुचाकीच्या मागे-पुढे चालत राहिले. इच्छादेवी चौकाजवळ आल्यानंतर एका भामट्याने हर्षा यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यानंतर तीघे भामटे भरधाव वेगाने आकाशवाणी चौकाकडे निघून गेले. हर्षा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाला मारहाण
कीर्तीकुमार डिगंबर शेलकर (वय ३९, रा. अडावद, ता. चोपडा) हे आर. आर. विद्यालयात कला शिक्षक आहेत. बुधवारी दुपारी २.३० वाजता ते घरी जाण्यासाठी शाळेबाहेर पडले. गेटजवळ असताना दुचाकीने दोन टवाळखोर तेथे आले. त्यातील एकाने शेलकर यांच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे त्यांनी त्याला हटकताच दोघांनी शेलकर यांच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. यात त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. या घटनेनंतर दोन्ही टवाळखोर पळून गेले.


अवैध दारू वाहतूक करणारी रिक्षा पकडली
शहर पोलिसांच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्यावरून शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारी रिक्षा पकडली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पथकाने रिक्षा (एमएच. १९ डी. ३००९) सह चालक सचिन रमेश शर्मा (रा. शिवराज अपार्टमेंट) याला ताब्यात घेतले.

केऱ्हाळेत घरफोडी
रावेर : घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर) येथे घडली. येथील एकता नगरातील सायराबी शेख अकबर या मंगळवारी सायंकाळी आपल्या मुलीकडे बऱ्हाणपूर येथे गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी पेटीतील २० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनी सोन्याचे पदक, तीन हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे कर्ण फुल व पंधरा हजार रुपये रोख असे ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज