अ‍ॅपशहर

पाणी, रस्ते ​ सुविधांसाठी एल्गार

शहरातील हरिविठ्ठल नगराजवळ आर. एम. एस. कॉलनी परिसरात गेल्या ३० वर्षांपासून नागरी वस्ती असूनदेखील अद्याप महापालिकेकडून कुठल्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.

Maharashtra Times 23 Aug 2017, 4:00 am
आर. एम. एस. कॉलनीतील महिलांची मनपात धडक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rsm colony womens agitation for common issue
पाणी, रस्ते ​ सुविधांसाठी एल्गार


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील हरिविठ्ठल नगराजवळ आर. एम. एस. कॉलनी परिसरात गेल्या ३० वर्षांपासून नागरी वस्ती असूनदेखील अद्याप महापालिकेकडून कुठल्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. या भागात तातडीने रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी मंगळवारी (दि. २२) अचानक परिसरातील संतप्त महिला महापालिकेत धडकल्या. त्या महिलांनी याबाबत महापौर नितीन लढ्ढा यांना निवेदन दिले.

महापौर लढ्ढा यांनी महिलांच्या भावना ऐकून तातडीने तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे आश्वासन महिलांच्या शिष्टमंडळाला दिले. आर. एम. एस. कॉलनीतील महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, परिसरातील गट क्रमांक ९५/२/१/२ तसेच ९९/२/१/२ मध्ये गेल्या काही वर्षांत रस्ते व गटारींची कामे करण्यात आलेली नाहीत. ज्या कच्च्या गटारी व रस्ते आहेत. त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्तेदेखील कच्चे असल्यामुळे पावसाचे पाणी व सांडपाणी घरासमोर साचत असल्याने डास व किड्यांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीच्या आजारातही वाढ झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

रस्त्यांअभावी मणक्याचे आजार

आर. एम. एस कॉलनीच्या बाजूला शिव कॉलनी, हरिविठ्ठल नगर, वर पोस्टल कॉलनी, आशाबाबा नगर असा भोवतालचा परिसर आहे. मात्र, या भागास जोडणारा एकही रस्ता नाही. कच्च्या रस्त्यांची वाट लागल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना मणक्याचे आजार जडले आहेत. विद्यार्थी, पालक, वयोवृद्ध नागरिकांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या भागात अनेक पथदीप बंद आहेत. काही ठिकाणी पोल आहेत पण पथदीप नाहीत, अशी तक्रारही महिलांनी केली.

पिण्याचे पाणी नाही

येथील काही भागात अद्याप महापालिकेचे पिण्याचे पाणी मिळत नाही. उघड्यावरील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील खुल्या जागेवर गवत, झुडपे वाढल्याने परिसराला अवकळा आली आहे. तरी या भागात तातडीने रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर चित्रा पंडित पिंपरकर, हेमंत सुतार, मनीष पाटील, दीपक चव्हाण, चंद्रशेखर सुरमारे, शितल डागर, विद्या लवणे यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तात्पुरत्या उपाययोजनाच्या सूचना

महापौर नितीन लढ्ढा यांनी मंगळवारी (दि. २२) आलेल्या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्यावर पाणीपुरवठा विभागाचे डी. एस. खडके, लाईट विभागाचे एस.एस. पाटील यांना बोलावून घेवून तात्पुरत्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज