अ‍ॅपशहर

शिंदे गटातील मंत्री आणि आमदारामध्येच जुंपली, मुख्यमंत्र्यांवर हस्तक्षेप करण्याची वेळ!

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकीकडे विरोधकांच्या टीकेचा आणि शिवसेनेच्या बाणांचा सामाना करत असताना दुसरीकडे त्यांच्याच गटातील मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपली आहे. मंत्री आणि आमदाराधील हा वाद थेट मुख्यमंत्री शिंदेंपर्यत गेला आणि त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2022, 11:40 am
जळगाव : सरकार बनतं तेव्हा यात कुण्या एकट्याचा नव्हे सर्वांचा वाटा असतो. सरकारमधील एखाद्या आमदाराला विचारात न घेता मंत्री काम करत असेल तर हा राजकारणातला क्षुद्रपणा आहे. मंत्री झाले म्हणून सरकार ही तुमची खासगी मालमत्ता नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांच्याच गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde
शिंदे गटातील मंत्री आणि आमदारामध्येच जुंपली, दोघांमधील वाद गेला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत


पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली. यामुळे आमदार चिमणराव पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा आमदारच काय, पण कम्युनिस्ट पक्षाचा माणूस जरी माझ्याकडे आला तरीही मी त्याच्यासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करेल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते. आता यावरूनच शिंदे गटातले आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एक एक मतांनी सरकार बनत असतं, सरकार आहे म्हणूनच तुम्ही आज मंत्री आहात, असा टोलाही चिमणराव पाटील यांनी नाव न घेता मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. माझ्यावर अन्याय झाला हे मान्य करतो, असं म्हणत याप्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी फोन करून यापुढे असं व्हायला नको, असं सांगितलं असल्याचंही आमदार चिमणराव पाटील म्हणाले.

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना मोठा धक्का, त्या १० नगरसेवकांची अपात्रता कायम

'उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुस्त पणा होता, शिंदे सरकार गतिमान'

आमदार चिमणराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुस्तपणा होता. कुठलाही निर्णय घेताना घेवू का नको? असा मागेपुढे विचार करत होते. मात्र या सरकारमध्ये गतिमानता आली आहे. आणि मलाही त्याचा अनुभव आला आहे. माझ्या मतदारसंघात दोन योजनांना मंजुरी मिळाली. आणि त्याबाबत प्रधान सचिवांनी रात्री बारा वाजता फोन करून मला माहिती दिली. यावरूनच समजतं की मुख्यमंत्र्यांना किती काळजी आणि कळकळ आहे, असंही आमदार चिमणराव पाटील म्हणाले.

जळगाव जिल्हा दूध संघात तब्बल १० -१२ तास पोलिसांकडून गुप्त चौकशी; काय आहे नेमकं कारणं?

महत्वाचे लेख